मंगळवार, २२ जुलै, २०१४

माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्या शिवाय मी राहू शकत नाही !!!!


माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्या शिवाय मी राहू शकत नाही !!!! 

माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्या शिवाय मी राहू शकत नाही. तू अगर कहे तो मै कुछ भी कर सकता हुं.......असे वाक्य मी खूप वेळा चित्रपटात ऐकले. लहानपणी पण कधी कधी मोठ्या लोकांच्या तोंडातून ऐकले होते की त्या मुलाचे व मुलीचे प्रेमप्रकरण आहे. काही लोक त्याला भानगड म्हणायचे. मला प्रेम या शब्दचा अर्थ पण माहित नव्हता व भानगड या शब्दाचा पण.

आज वयाच्या चाळीशीत कळतय मला थोडं थोडं प्रेम म्हणजे काय व भानगड म्हणंजे काय ?
स्वतःच्या आयुष्याकडे थोडं परत वळून पाहतो त्यावेळी समजून घ्यायचा प्रयत्न करतो, प्रेम म्हणजे काय ?

सातवी पर्यंत माझे व अभ्यासाचे वाकडे, मस्त खेळणे, हुंदडत राहणे, मारामाऱ्या करणे म्हणजे हिरोगिरी... असे हिरो मुलींना आवडतात असा एक समज होता. साहजिकच परिणाम व्हायचा तो झाला. क्लास मिळाला. पण खोट बोललो आईला...त्याचा परिणाम आई रडायला लागली. पहिल्यांदा पोटात कालवा कालव म्हणतात न ती झाली. शाळा बदलली. नवीन शाळेत छान मुली होत्या हुशार मुलांशी त्या बोलायच्या. आपुन से कौन बात करेगा ? स्वतःची पण खूप लाज वाटायला लागली. आईच्या डोळ्यात परत आपल्या अभ्यासामुळे अश्रू येणार नाहीत व स्वतःची स्वतःला कधीच लाज वाटणार नाही असे काही करायचे नाही हे मनाशी पक्के ठरवले. मी आईवर व माझ्या स्वतःवर खर प्रेम करायला सुरुवात केली. माझी अभ्यासात जोरात प्रगती झाली सतत वर्गात, शाळेत पहिलाच येऊ लागलो. आज तागायत अभ्यासामुळे माझ्या आईच्या डोळ्यात पाणी नाही येऊ दिले. आपण ज्याच्यावर प्रेम करत्तो त्याच्यासाठी आपण आपल्यात सकारात्मक व चांगला बदल करतो त्या मुळे दोघांना पण आनंद होतो व मस्त वाटते.

महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाला असताना तारुण्यसुलभ म्हणतात ना तसे भाव मनात निर्माण होऊ लागले. एक मुलगी खूप आवडू लागली. साहजिकच ती सुंदर होती. मित्रांना पण कळले. मग काय तू तिच्यावर प्रेम करतोस न मग करपलेली पोळी खा ....अशा प्रकारच्या शर्ती लागू लागल्या. फार काळ मी तसे प्रकार नाही करू शकलो. परत स्वतःची लाज वाटायची. आपण हे का करतो ? आणि मग सोडून दिले ते पण .....

साहजिकच पुढे मात्र मी खूप पुढे गेलो. आपल्या यशात नटल्यावर मग तासोंतास आरशात पाहण्याची गरज नसते आणि कुणा एखाद्या व्यक्तीवर आपल्या बाह्य गोष्टीनी प्रभाव टाकण्याची इच्छा पण रहात नाही. आपण स्वतःवर प्रेम करायला लागल्यावर उगी दुसऱ्यावर इम्प्रेशन टाकण्याची इच्छा पण होत नाही. त्यामुळे मी कुठल्या भानगडीत अडकलो नाही.

पदव्युत्तर शिक्षण झाल्यावर मात्र वाटले आता आई सोबत रहावे. आईची इच्छा नव्हती. मग भांडणे. शेवटी खूप टोकाला गोष्टी गेल्या. पण यावेळी सोबत होती माझ्या माझी संघटना व माझे चांगले मित्र. त्यांनी मला खूप साथ दिली. दोन खूप छान अनुभव मिळाले व स्वतःतील मस्त बदल जाणवू लागला. अण्णासाहेब हजारे, प्रबोधिनीतील सर्व ज्येष्ठ सदस्य व मित्र यांच्या साथीने मी माझ्या भागातील प्रश्नान कडे सजकपणे पाहायला सुरुवात केली. किल्लारी भूकंपातील मदत कार्य व अण्णासाहेब हजारे यांच्या आंदोलनात त्यांचे स्वीयमदतगार म्हणून काम करण्याची संधी मला माझ्या संघटनेनी दिली. एक व्यक्ती म्हणून मी कितीही हुशार असलो तरी हे अनुभव मला माझ्या संघटनेमुळे मिळाले. आई सोबत आपल्या मातृभूमीवर पण प्रेम करण्याचे अनुभवशिक्षण मला मिळाले. खूप छान वाटत होतं स्वतः कडे पाहताना स्वतःलाच ......अपने धून में रहता था !!!! स्वतः असे काही शिकून घेऊ....अशा काही अवघड वातावरणात..प्रदेशात राहू ..खूप कष्ट करू मग आपल्या आईला नक्की वाटेल की आपला मुलगा अंबाजोगाईत राहिला सोबत तरी तो काही तरी चांगले नक्की करेल. आपल्या स्वतःच्या क्षमत्ता विकसित करायला लावते ते खरे प्रेम असते. आव्हाने स्वीकारायला शिकवते ते प्रेम असते. निडर पणे कुठल्याही समस्यांना तोंड द्यायला प्रेरणा देते ते प्रेम असते.

पुढील पाच वर्ष मला माझ्या प्रेमाने एक ध्येय धुंद आयुष्य जगायला शिकवले. सुंदर नट्यांची माझ्या खोलीतील जागा शूर वीर आणि देशप्रेमी वीरांनी घेतली. ओठावरील गाणे बदलली. वाचण्याची पुस्तके बदलली. आवडीचे चित्रपट बदलले ......एकदम सॅालिड बदल हो .....काय मस्ती असते अशा प्रेमाची... मात्रभूमीच्या अशा भागात काम करायचे की जिथे सैन्य पण तीन वर्षापेक्षा जास्त ठेवले जात नाही. खूप काही मिळाले......प्रेमात नेहमी द्यावेच लागते असे काही नाही. खरे प्रेम आपल्याला खूप काही देते. खूप मजबूत बनवते. आणि राहिले यशाचे एकदा तुम्ही मजबूत झालात न मग यश तुमच्या पाठीमागे धावते. खूप लहान वयात मोठ्या मोठ्या देशपातळीवरील कर्तृत्वाच्या संधी मला मिळत गेल्या. अभी तो मैने प्यार करना सिखा था !!!!

यशाच्या एका उच्च शिखरावर असताना मात्र मला नव्हता विसर पडला माझ्या आईचा, माझ्या मातृसंघटनेचा. मी परत अंबाजोगाईस यायचे ठरवले. आपण कितीही पुढे गेलो तरी व कितीही यश मिळत असले तरी आपले ज्यांच्यावर खरं प्रेम आहे न त्यांच्यासाठी आपण आपल्या त्या उपलब्धीचा त्याग करतो. असे त्याग करणे जमले म्हणजे खरं प्रेम करणे जमायला लागते. मग हे नाही. ते नाही ही कमी ती कमी असे काही उरत नाही. गम्मत म्हणजे जी काही कमी आपल्याला वाटते ती योग्य वेळी पूर्ण होते अगदी भौतिक पण याचा खूप वेळा अनुभव आला.

याच काळात अजून एक गोष्ट लक्षात आली की जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते न ती स्वतःत पण खूप बदल करून घेते आपल्यासाठी. आई, माझ्या कुटुंबातील व संघटनेतील ज्येष्ठांनी माझ्यासाठी खूप बदल करून घेतले स्वतःत आणि साहजिकच मी पण बदलायला लागलो. प्रेम हे दोघांमध्ये पण खूप चांगला बदल घडवून आणते. आणि त्या बदलातून समाजाला अधिक चांगल्या गोष्टी मिळू लागतात. आपल्याला तर नक्कीच.

पैसा,सत्ता, बाकी भोग खरच दुय्यम ठरवते प्रेम. एकमेकांचा आनंद व एकमेकांचा खरा विकास हाच खरा हेतू असतो प्रेमाचा.


मधल्या काळात एक मात्र मला थोडी विचित्र इच्छा मनात होती. आपण काही तरी करून दाखवले पाहिजे. आपण कुणी तरी आहोत हे जगाला कळल पाहिजे. एका व्यक्तीवर नाही पण लोकांनी आपल्याला दि ग्रेट म्हणावे असे मनातून वाटत असे. यामुळे मग दिनचर्या बिघडली. थोडे नको त्या गोष्टी मी करायला लागलो. नको ते लोक सोबत. साहजिकच परिणाम व्हायचा तो झाला. माझी प्रकृती ढासळली. माझ्याच्याने कुठलीच गोष्ट नियमित होत नसे. सुंदर पद्धतीने अभिव्यक्त होण्यापेक्षा दिखावू पणे अभिव्यक्त होण्याची सवय जुडली. मानसिक व शाररीक आरोग्य बिघडले. अशा वेळी खरं कळते आपली लोक कोण...आपल्यावर प्रेम करणारी लोक कोण ...तात्पुरते प्रेमाचा शिडकाव करणारे खूप असतात पण खरं आतून प्रेम करणारे लोक खूप काळजी घेतात आपली. आपल्याला वाऱ्यावर नाही सोडत. खूप छान जपले मला माझ्या आईने,कुटुंबाने, मित्रांनी व संघटनेतील माझ्या सहकाऱ्यांनी.


खरं प्रेम समजायला वेळ लागतो. Love at first sight हे समजायला आधी आयुष्य व जीवन समजायला पाहिजे. मी ठरवले आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांसाठी व आपल्या संघटनेसाठी स्वतःला परत मजबूत करायचे. मी नियमित व्यायाम सुरु केला. नवीन कामे सुरु केली. जुनी महत्वाची पण राहिलेली कामे पूर्ण करू लागलो. नियमित ध्यान व आहारावर खूप चांगले नियंत्रण आणले. याच काळात दोन अपघात होऊन माझे दोन पाय जवळपास सहा महिने जायबंदी झाले होते. पण त्या मुळे मी न डगमगता लिहायला शिकलो. भावना शब्दात मांडायला शिकलो. पाणी, प्राणी,वृक्ष आणि शेतकरी यांच्यासाठी मनातून प्रेमाने काम करायला सुरुवात केली. “ असे काही तरी कर की लोक तुझ्या व्यक्तिगत गोष्टींकडे न पाहता ...अभावा कडे न पाहता तुझ्या कामाकडे पाहतील” अशी साद एकू आली. माझी दिनचर्या बऱ्यापेकी स्थिर झाली. वजन कमी होऊन शरीर दणकट झाले. दिवसाचे १६ तास काम करण्याची शक्ती परत मिळाली. आपल्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी आपलं नेहमीच शाररिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असले पाहिजे हे पक्के पटले व तसा सक्षम परत झालो.

आयुष्यात चढउतार नेहमीच येत राहतात. कधी आपल्या लोकांकडून त्रास पण होतो पण आपण जर खर प्रेम केले असेल न तर आपल्या सोबत अशी माणसे येतात की ते आपल्याला परत ढवळून काढतात. परत आपल्याला उमेद देतात जीवनाकडे परत वेगळ्या दृष्टीने पहा असे सांगतात. अचानक आलेली माणसे आपल्यावर इतका खोल परिणाम करू शकतात का ? मला वाटते तुम्ही खरच आयुष्यावर प्रेम केले असेल तर असे आगंतुक लोक सहज येतात आपल्या आयुष्यात व परत आपण लागतो सृजनाच्या निर्मितीच्या प्रवासाला. मस्त छायाचित्र काढायला शिकलो मी. निसर्गावर प्रेम करायला शिकलो मी .....माझ्यातील “मी” जोपासलेला “मी” किती क्षुल्लक आहे याची जाणीव झाली त्यांच्या मुळे व थोडा “मी” विसरायला शिकलो मी ...शांत झोपायला शिकलो....जन्माला आलो तेव्हा पासून दूध पिणारा मी चक्क दूधच पचत नव्हते मला आणि आता मला दूध पचायला लागले.

प्रेम माणसाला विश्वास टाकायला शिकवते आणि योग्य व्यक्तीवर. प्रेम माणसाला सातत्य पूर्ण एखादी कृती करायला शिकवते. प्रेम माणसाला सृजनशील व निर्मितीक्षम बनवते. प्रेम माणसाला अवलंबित्व नाही तर परस्परावलंबनातून भावनिक व वैचारिक स्वावलंबन शिकवते. प्रेम आपल्याला ताकदवान बनवते. अस्वस्थता कमी करते..भीती कमी करते ..सहजता वाढवते ...आणि मग जाणवते

धुंधला जाएँ जो मंजिलें, इक पल को तू नज़र झुका
झुक जाये सर जहाँ वहीं, मिलता हैं रब का रास्ता
तेरी किस्मत तू बदल दे, रख हिम्मत बस चल दे
तेरा साथी, मेरे क़दमों के हैं निशां
तू न जाने आस पास हैं खुदा......
त्यातून आपण
" मन मस्त मगन,
मन मस्त मगन,
मन मस्त मगन"
परत जोरदार कामाला लागतो न थकता न चिडता न खचून जाता.