सोमवार, ७ एप्रिल, २०१४

“वो सानिया मिर्झा है ये हमारी सानिया पठाण है ”


दुपारची चांगलीच गर्मी जाणवत होती. गोविंद अकुस्कर या तरुण मित्राशी नेट वर बोलत होतो. त्याच काळात माझा मोबाईल वाजला. “नमस्कार दादा, मी रमा बोलतेय.” “रमा ? कोण रमा ?” माझ्या बोलण्यातून सहज विचारण्यात आले. “दादा,मी रमा हजारी, लहान असताना प्रबोधिनीत यायचे. सध्या ME करते आहे.” “ओह रमा तू का ? काय म्हणतेस ?” दादा, आमच्या घरी लहानपणी मला सांभाळणारी आजी होती. तिची नात चार वर्षाची आहे. तिला जन्मा पासूनच दोन्ही हात नाहीत आणि एक पाय नाही. तिला शाळेत घालायचे आहे. कोणत्या शाळेत घालावे हे विचारण्यासाठी फोन केला.” “अशी मुलगी अंबाजोगाईत आहे ?” मी प्रश्न केला. “हो दादा” रमा खूप शांतपणे म्हणाली. मी तिला अनेक प्रश्न विचारले शेवटी आम्ही मुलीला भेटायचे ठरवले. रमा भर दुपारी १ वाजता पण यायला तयार होती. मग मीच म्हंटले आता नको आपण थोड उन उतरल्यावर जाऊ. साडेचार वाजता त्या मुलीला भेटायला जायचे ठरले. तो पर्यंत मनात खूप प्रश्न निर्माण झाले. दुपारची वाम कुशी घेण्यासाठी पडलो पण डोळा काही लागला नाही. बरोबर सव्वाचार वाजता रमाचा फोन आला की ती घरातून निघतेय. मी पण तयार होतो. आम्ही दोघ प्रबोधिनीच्या कार्यालयात भेटलो. रमाला मी अनेक प्रश्न विचारले. ती खूप शांतपणे सगळी उत्तरं देत होती. तिच्या त्या शांत स्थिर स्वभावाचे मला कौतुक वाटले. “ते मुस्लिम आहेत दादा.” “अग मग त्यांना चालेले का प्रबोधिनी.” “काहीच प्रश्न नाही. त्यांना शाळेत प्रवेश मिळणार हे ऐकूनच ख़ुशी होईल.” आम्ही दोघंही मग सानियाला भेटण्यासाठी तिच्या घरी म्हणजे सदरबाजारातील पेन्शनपुरा या भागात गेलो. घर सापडणे थोडे अवघड होते, रमा ने फोन करून सानियाच्या आजीला बोलावून घेतले. आम्ही सानियाच्या घरी पोहोंचलो. गल्लीच्या टोकाला अगदी आत मध्ये दोन पत्र्याच्या खोल्या. आम्हाला घरात नेण्यात आले. उंचीला खूप खुजे असलेल्या घरात आम्ही चटईवर बसलो. आजी, आई,काकू व आजोबा खेरीस बरेच अनेक छोटे मुलं पण होती. त्या छोटीला आईने आमच्या समोर आणले. तिला दोन अगदी खांद्या पासून नव्हते. एक पाय नव्हता. ती अभावित पण आमच्याकडे पाहात होती. “आदाब कर सानिया सर को आदाब कर” तिची आजी सानियाला सांगत होती. सानियाचे डोळे खूप बोलके होते पण तिला आम्ही अपरिचित होतो. “अरे सानिया बेटा तू कितनी प्यारी है ..अरे हम तो एक चीज भूल ही गये, आपको हमने कुच्छ भी नही लाया...क्या खायेगी आप ...चॉकलेट बडा वाला चॉकलेट..” तीने लाजत मान डोलावली व तिच्या बहिणी करवी चॉकलेट आणून घेतले. त्याच दरम्यान तिच्या आजीने आमच्यासाठी शीतपेय मागवली. “वो सानिया मिर्झा है ये हमारी सानिया पठाण है ” गमतीने तिची आई म्हणाली. सानिया खूप गुणी लेकरू. ९० % अपंग पण तिला शाळेत काही कुणी प्रवेश देत नव्हते. घरातील सर्व मुले शाळेत जाताना पाहून तिला पण शाळेत जावे वाटते. पण तिची जबाबदारी घायला कोणतीच शाळा तयार नाही. तिची आजी एक चांगल्या शाळेत सेविकेचे काम करते. मी तिला म्हंटले की त्या शाळेत प्रवेश द्यायला मी सांगतो. पण ती सरळ नको म्हणाली. प्रबोधिनीचे शिशुविहार थोडे दूर आहे. तिला कसे घेवून येणार. “ उसका गाडा है न उसगाडे पे लेके आयेंगे ” उत्साहात तिच्या सगळे घरचे लोक म्हणाले. “दादा ते करतील सगळे.” रमा, जिचे लग्न केवल अजून काहीच दिवसांनी आहे ती भर उन्हात माझ्या सोबत येते व उत्साहाने मला हे सांगते. “बहोत प्यारी लडकी है ये ...मां को कहती है तुम काम पे जाओ मै नही रोयेगी.” सानियाचे वडील दिवस भर फक्त टीवी पहात झोपलेले असतात. काही काम नाही करत. थोड्या वेळातच सानिया एकदम खुलली. तिने तिच्या पायांनी स्वतः चॉकलेट खाले. ती खुदुखुदू हसू लागली. मी तिचा फोटो काढला तर एकदम खुश होऊन स्वारी ती पहात होती. घरातील वातावरण एकदम खुश होते. आजोबा गफार सायकल रिक्षा चालवायचे. मला त्यांना पाहिले की मला लहानपणी शाळेत सायकल रिक्शेत नेणाऱ्या खांसाहेबांची आठवण झाली. मन एकदम तरल अवस्थेत होत. आम्ही जायला निघालो. घरातील सर्व महिला, बच्चे कंपनी व आमची सानिया सोडायला आम्हाला बाहेर पर्यंत आली. “आदाब कर सानिया सर को.” तिने आपला छोटा पाय उचलला व डोक्यापर्यंत नेत आदाब केला. मी टाटा म्हंटल्यावर तिने आपल्या त्या छोट्या पायांनी मला टाटा केला. ती तिच्या एकमेव पायाचा चांगला वापर करायला शिकली होती. रमाशी काही गोष्टींबाबत चर्चा करून आम्ही एकमेकाचा निरोप घेतला. काही दिवसात मी तुला प्रवेशा बद्दल सांगतो असे तिला म्हणालो. काल मी प्रबोधिनीतील शिशुशाळा ताईंच्या प्रशिक्षण वर्गात ओळख करून घेण्यासाठी गेलो होतो. काही चर्चा पण केली व त्यांना विचारले सानियाला शाळेत प्रवेश दिला पाहिजे की नाही. सगळ्यांनी एक मुखांनी सांगितले दिला पाहिजे. अभिजितला विचारले .... “नक्कीच दिला पाहिजे..आपण देणार नाहीत तर कोण देईल मग कोण ?.....आपल्या मुलांवर याचा खूप चांगला परिणाम होईल...” आम्ही सर्वांनी सानियाला आपल्या शिशुविहार मध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. “सानिया” आम्हाला खूप काही शिकवेल यात आम्हा सर्वांचे आजीबात दुमत नाही

बुधवार, २ एप्रिल, २०१४

“मानूस लई उतावळा असतो तस देवाचे नाई...तो पक्की सजा देईल, त्यांची येळ आली की.”


सुधाकर भाऊ ....मामा अशा अनेक नावाने श्री सुधाकर निकम यांना आमच्या घरात हाक मारले जाते.सकाळी घरातील गजानन महाराजांच्या मंदिराची घंटी वाजली की समजायचे सुधाकर महाराज आले....बहुतेक वेळा मी त्यावेळी व्यायाम करत असतो. दरवाजा उघडून आत आले की आम्ही दोघंही मोठ्यांनी गर्जना करतो “गजानन महाराज की जय ” व त्यानंतर मी म्हणतो “सुधाकर महाराज की जय” एकमेकांना सकाळी अभिवादन करण्याची आमची ही रीत.

लहानपण खडकावर म्हणजे खडकपुऱ्यावर ...सुरुवातीस शेळ्या राखणे हा व्यवसाय ....सोबतच त्या परिसरातील नवीन बांधल्या जाणाऱ्या आमच्या घराची वॉटरिंग तो करायचा...त्याचा आणि आमच्या कुटुंबाचा ऋणानुबंध असा सुरु झाला.दिसताना थोडा भोळा वाटणारा सुधाकर भाऊ वागताना कमालीचा व्यवहारी आहे. सुधाकर भाऊचे एक अनोखे नाते अगदी लहानपणा पासून आमचे होते. त्यावेळी पासून ते आत्ता पर्यंत. मी व माझी बहिण आरतीला रात्री औरंगाबादला जाताना आमचा पेटारा आपल्या खांद्यावर घेवून येणारा व आम्हाला बसून देणारा..व निरोप देताना मान खाली घालून अश्रू लपवत टाटा करणारा आमचा मोठा भाऊ ...

मी अरुणाचल मध्ये असताना आरतीच्या मुलीचे बारसे सुधाकर भाऊच्या मांडीवर काढले....आईच्या तर आयुष्याचा तो एक अविभाग्य घटक आहे. तिला पण आता एकू येत नाही व भाऊला पण... खुपच गमतीदार पद्धतीने त्यांची जुगलबंदी चालू असते. एकमेकावर चिडत, ओरडत व शेवटी हसत. तो तिचा “ सुध्या ” तो “गजानन महाराज” कधी झाला हे कळलेच नाही. आई ने त्याला तिच्या आयुष्यात गजानन महाराजांचे स्थान दिले.

भाऊ तसा खूप भावूक आहे. माझ्या पायाला अपघात झाला. सकाळी त्याने माझा पाय बांधलेला पाहिल्यानंतर तो जवळ आला. माझ्या पाया जवळ बसला. हळूच आपले हात माझ्या उघड्या बोटांवर फिरवले. माझ्याकडे पाहिले व लगेच मान खाली घालून त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा धारा....तसा तो खुपच हळवा आहे आमच्या बाबत. नगरपालिकेतील बऱ्या पगाराची नौकरी असली तरी त्याने आमचे काम करणे सोडले नाही. त्याला तीन मुली व एक मुलगा. भाऊची बायको मात्र खमकी आहे. तिच्या मुळे त्याचा संसार चांगला चालू आहे.

तो कधी कधी खुपच वेगळा वागतो. दर रविवारी तो आपल्या मुलांना बेकरीतून खारी आणतो. घरी जाताना मग आमच्या कडे येतो व त्यातील एक पुढा आम्हाला देतो. नको म्हंटल तर त्याच्या विशिष्ठ आदाकारीत थोडं लाजत म्हणतो .. “ राहू द्या मोप आणलेत..”

दररोज सकाळी अंबाजोगाईतील इत्यभूत वार्ता तो मला सांगतो. त्याला नीट वाचता येत नाही पण वर्तमानपत्र मात्र तो पूर्ण चाळतो. त्यात प्रचंड ताकद आहे. वय पन्नाशीच्या आसपास असले तरी मोठ लोखंडी कपाट एकटा उचलू शकतो. आधी त्याच्या सोबत असायची त्याची सायकल व एक रेडिओ...त्याला गाणे समजते का ते माहित नाही पण त्याला सतत गाणे लागतात काम करताना. आत्ता रेडिओची जागा घेतील मोबाईल ने ...लावणी पासून इंदोरीकर महाराजांचे कीर्तने सगळे काही चालू असते.

सकाळी मामाचा मूड चांगला नव्हता. आज त्याच्या कडे कुठल्या राजकारण्याची खबर नव्हती. तो थोडं रडवेला होता... “ दादा अहो चोरी झाली. देवीचे दागिने चोरले कुणीतरी पाप्याने.” तो फार खिन्न होऊन सांगत होता. अस्वस्थ होत तो उठत म्हणाला, “मानूस लई उतावळा असतो, तस देवाचे नाई...तो पक्की सजा देईल, त्यांची येळ आली की.”
फार मोलाचे तो बोलला होता “ माणूस लई उतावळा आहे.” माझा पूर्ण दिवस त्या शब्दांचा विचार करण्यात गेला.

ज्ञान प्रबोधिनीच्या शिशुविहारची अगदी आरंभापासून त्याचे नाते. स्वच्छता करणे हे त्याचे काम. मुलांशी त्याचे वेगळेच नाते. लहान मुलांना त्याच्या टिपिकल आदाकारीत ती नाचून पण दाखवे. मुलं एकदम खुश. आरतीच्या लहान मुलीने एकदा त्याच्या अंगावर शी केली तर हा माणूस हसत हसत येत आईला म्हणतो, “बघा ,वाहिनी लेकरांनी प्रसाद दिला.”

माणसाचं मन इतक निर्मळ, निर्व्याज होऊ शकते अगदी लेकरांसारखे ?

आठ दिवसांना पूर्वी भाऊची एकच गडबड होती.

“ बाजारात हारं आलेत आता आनावं लागतील लेकरांसाठी.”

नवीन वर्षाचा गुडी पाडवा येणार होता. भाऊ त्याच्या मुलावर खूप प्रेम करतो. त्याला सायकल घेवून फिरायला जातो. शाळेत सोडायला जातो तर कधी शाळेतून आणायला जातो.मला वाटले गुडी पाडाव्यासाठी त्याच्या मुलांसाठी तो गाठी ( हार ) आणायचे म्हणतो आहे. दुसऱ्या दिवशी परत तो मला म्हणाला, “अव, दाद हारं आनावं लागतील न ? बाजार सजला बघा.लई बेस्ट हायत.”

“मग अनुकी त्यात काय.”

गुडी पाडव्याच्या दोन दिवस आधी सकाळी अकराच्या सुमारास भाऊ आपला हातात एक मोठे खोके घेवून आला.

“हे बघा लई झाक हार आणलेत.”

त्याने चक्क शिशुविहार मधील पन्नास मुलांसाठी गाठी आणल्या होत्या. मी ते पाहून तर अवाकच झालो. यार हा माणूस शिकलेला नाही. फार श्रीमंत पण नाही त्यातल्या त्यात त्याचा पोरगा पण शिशुविहार मध्ये नाही तरी याच्या जाणीवा एवढ्या व्यापक कशा ? पै पै साठी भाऊ बंधकी....संपत्तीसाठी व घरासाठी भाऊबंधकी सुधाकरभाऊ नी पण सोसासली होती.स्वतःच्या पैशातून त्यांनी बांधलेल्या राहत्या घरातून त्याच्या भावांनी त्याला बाहेर काढले होते.त्याच्या या विषारी अनुभवातून मात्र त्याच्या जाणीवा काही बोथट झाल्या नाहीत....


त्याची कृती ही त्याच्या नावा प्रमाणेच “सुधाकर” होती.

मी आईला विचारले सुधाकरचा अर्थ काय..... “अमृत”

सुधाकर मामाकडून गळ्यात हार घालून घेताना शिशुविहार मधील आपल्या लेकरांची चेहरे अमृतपान करतो आहेत अशीच खुलली होती. त्यांच्यासाठी साखरेची ती गाठी अमृता सारखीच गोड होती न....

मी मात्र सुधाकर भाऊच्या तृप्त चेहऱ्याकडे पाहून माझी तहान पण भागून घेत होतो.