सोमवार, २ डिसेंबर, २०१३

त्याला यामुळे डिप्रेशन येवून थोडंच चालणार ...


बालाजी भुजंगराव कदम वय वर्ष २६,राहणार चनई. शिक्षण ७ वी नंतर शाळा सोडली व सत्यकामासारखा गाई,म्हशी,बैल घेवून बाहेर पडला सत्याच्या शोधात नाही तरी वितभर पोटाची भूक भागवण्यासाठी. जसा तो बाहेर पडला तसा घरातील तेल,मिरची साखरेचा खर्च तोच करत असे. वडील भुजंगराव त्यांच्या भावात सर्वात धाकले. शिक्षणासाठी अंबाजोगाईत जाणे त्यामुळे शेतीची फार कामं नाही येत. अगदी औत धरणे किंवा बैलगाडी चालवणे. दहावी काही निघाली नाही मग परत शेतीत पण मोठे भाऊ होते त्यामुळे फार काही करावे लागले नाही.

बालाजीला मात्र भाऊ नाही त्यामुळे खेळण्याच्या वयातच त्याला सगळे शिकावे लागले. कदमांच्या वाटण्या झाल्या व बालाजीच्या कुटुंबाला आलेली वाटणीची मशागत आता बालाजीलाच करावी लागली. आपल्या विवेकवाडीच्या कामाची सुरुवात झाली व त्यावेळी पासूनच बालाजीची व माझी दोस्ती.

तो व त्याचा चुलत भाऊ परमेश्वर (प्रेम ) आपली गुरे चारण्यासाठी यायची. त्यांच्या बरोबर सहभोजन होई. बालाजी उंच,सावळा पण कष्ट करण्याची खूप तयारी खूप प्रेमळ. सकाळी ५ ला उठून धार काढणे, दुध वाटप करणे तेही सायकलवर दहा वाजायचे यातच. मग गुरांना घेवून शिवावर चालत यायचे त्यांना चारण्यासाठी. मग दिवसभर गुरांच्या मागेच. जेवण पण अगदी उठता बसता. चुकून एखाद्याच्या रानात गुरं गेली तर अवघडच...

बालाजी मला म्हणाला, “हे आम्हा लोकांच्या नशिबीच पहा..माग एकदा फकत कांबळे मामांच्या शेळ्या एका कदमच्या शेतात गेल्या तर त्यांना त्याने चाबकाने मारले.रानांत काहीबी नव्हत ...मग मीच मध्ये पडलो.”


खूप कष्ट करून एक एक म्हैस बालाजीने वाढवली. आता बर चालले होते पण आता थोडं स्थिरावे वाटत होते. शेती चांगली करावी. बोर घ्यावी म्हणजे दोन पिकं तरी घेता येतील. परमेश्वरनी बोर घेतलं होत आणि चांगल पाणी लागलं. त्याच गुरा मागे फिरणे पण बंद झाले होते. बालाजीला पण वाटले घेवून टाकू. अजून ताईच लग्न बाकी आहे. तोडा पैसा पण जमा होईल. जमीन नाही विकावी लागणार.

शेवटी चार म्हशी विकून टाकायच्या ठरवल्या. थोडा पैसा आला व बोर घेतली. ४०० फुटाला बर पाणी पण लागले. पण प्रश्न आता लाईटचा...अनेक हेलपाटे व चिरीमिरी देवून शेवटी सहामहिन्यांनी लाईट ओढली. आता थोडं बर वाटत होत. दुसऱ्या दिवशी टेस्ट करायला म्हणून मोटर घेवून तो आला तर त्याच्या काळजात धसकाच बसला...कुणीतरी कुपनलिकेत बरेच दगड टाकले होते. बऱ्यापेकी ती बंद केली होती. चूप चाप मनातल्या मनात रडण्यापेक्षा काहीच करता येत नव्हते. रीबोर करायचे तर तेवढाच खर्च आता पैसा पण नव्हता. शेती विकायची नाही कारण शेती विकण म्हणजे आईला विकण. परत आपले नेहमीचे काम सुरु.

एखाद्याच्या मदतीने एक म्हैस घावी व नित्य नियम सुरु. ताईच लग्न बाकीच होत आता त्याला पण सोयरिकी यायला लागल्या.

मागच्या वर्ष्यापासून माझे विवेकवाडीत जाणे वाढले त्यामुळे बालाजीशी मैत्री पण. हळूहळू ही मैत्री आमच्या पारिवारिक नात्यात बदलली. यावर्षी आम्ही बालाजीलाच शेती करायला दिली. पावसाने पण साथ दिले चांगले उत्पन्न आले. बालाजी, काका व ताईने खूप मेहनत पण घेतली. सोयाबीनची रास पण लागली. चांगला उतार आला. चांगलं वाळूदेऊन खळ करावे व त्याधी काही पुढील मशागतीची कामे जमीन ओली आहे म्हणून करावेत म्हणून बालाजी त्याच्या मागे लागला. खालच्या शेतात जवळचा शेतकरी पाणी देतो म्हणाला म्हणून गहू पेरण्याची तयारी चालू केली.

समद चांगलं चालल होत. एक आपेगावची सोयरिक बालाजीला आल्याचे काकांनी मला सांगितले पण. दोन दिवसापूर्वी मी पुण्याला गेलो व परत अंबाजोगाईला आलो तर माझ्या बायकोने मला विचारले, “बालाजीचा काही फोन आला का रे ?”

“नाही ग त्याचा फोन हरवला आहे.”

“अरे काल केदारचा फोन आला होता तो म्हणाला बालाजीच्या शेतातील सोयाबीन कुणीतरी रात्री जाळून टाकले.”

एकदम बालाजीचा चेहरा डोळ्या समोर आला व त्याच्या समोर त्याच्या अपार मेहनतीने राख झालेले सोयाबीन व त्याबरोबरच त्याची स्वप्न ही ......
का,कुणी हे प्रश्न .....उत्तर मिळाले तरी काय उपयोग ....

त्याला यामुळे डिप्रेशन येवून थोडंच चालणार ...घरातील चार जणांच्या पोटांसाठी त्याला डोळ्यातील आसवानां गिळून अंगातून अजून घाम गाळावा लागणार हे कटुसत्य त्याच्या अंगवळणी पडले आहे.

रविवार, १ डिसेंबर, २०१३

आज काल मी अभ्यासच थांबवला ....काय मिलते हो त्यातून ?



आपण अनुभवलेले व्यक्त करणे ही सहज प्रक्रिया आहे. व्यक्त करत असताना आपण बोलण्यातून, छायाचित्रातून व लेखनातून व्यक्त होत असतो. लेखनातून व्यक्त होणे थोडे अवघड असते. आपल्या भावना शब्दात लिहून व्यक्त करणे हे तसे अवघड जाते. पाहू वेळ मिळेल तसे लिहू. निवांत वेळ मिळाल्यावर लिहू. आता काय घाई आहे मग पाहू हे खरे तर दोन कारणानी होते १)म्हणजे असे लिहिण्याची सवय नसते २) आणि असेल तर आपल्यात खूप आळस असतो.

पहिली स्थिती असेल तर शिकणे ही प्रक्रिया असते. पण आपण आज काल शिकण्यासाठी खूप कमी वेळ देतो. आपले शिकणे काही कारणास्तव असते. मला स्वतःला जे आपण परीक्षेसाठी करतो किंवा पदवीसाठी करतो अथवा नौकरी मिळावी म्हणून करतो. खर पाहता अभ्यास करणे व शिकणे या दोन सारख्याच प्रकिया आहेत आपण त्यात थोडा भेद आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी शिकणे म्हणजे अभ्यास करणे नव्हे. आपल्या स्वतःला आजच्या आपल्या अवस्थेपेक्षा उन्नत किंवा अधिक विकसित अवस्थेत नेण्यासाठी शिकणे म्हणजे अभ्यास करणे. अशा प्रकारच्या अभ्यासाने आपले मन एकाग्र होण्यास मदत होते व आपल्या विकासाची प्रक्रिया सतत चालू राहते.

मुळात दुसऱ्या प्रकारचा आडथळा म्हणजे आळस हा केवळ आपण आपल्या शैक्षणिक काळात केवळ काही तरी मिळवण्यासाठी केलेले शिक्षण असते व आता ते मिळवल्यावर शिकण्याचा थोडा कंटाळा आलेला असतो.फार केले न आता बस आता निवांत जगू ...पण निवांत जगू म्हणजे काय ? खरच आपण निवांत जगत असतो का ? मला वाटते या निवांत जगू या मध्ये एक प्रकारचा आपण टाईमपास करत असतो. कारण आपल्याला आपल्या आयुष्याचे महत्वच कळलेले नसते. आयुष्य म्हणजे भोग घेणे होऊन बसते व आपण निखळ आनंदाला पारखे होतो. निखळ आनंदासाठी सतत अभ्यास करत राहणे गरजेचे असते. मनाची निरव शांतता म्हणजे आनंद. भोगा मुळे तो काही काळासाठी मिळतो पण तो तात्पुरता असतो. सतत आपल्या मनाला निखळ आनंदात ठेवण्यासाठी नियमित अभ्यास करत राहणे आवश्यक असते.

आपण अभ्यास करेन म्हणजे पाहणे, अनुभवणे,निरीक्षण करणे, समीक्षण करणे, मग त्यानतंर व्यक्त होणे. मी अगदी वर सांगितल्या प्रमाणे.

आपण अभ्यास करतो का याचे पाहिले दृश्य स्वरूप म्हणजे आपण ते लिखित स्वरुपात व्यक्त करतो. दुसरे ते लगेचच करतो म्हणजे अनुभव घेतल्यावर काही वेळात. कधी कधी आपला विचार पण पूर्ण झाला की नाही हे न पाहता पण. अर्थात पहिली गोष्ट होते ती म्हणजे आपण तत्पर होतो अर्थात आपण प्रतिसादी होतो. ही अभ्यासाची पहिली पायरी.

दुसरी पायरी आपण काय अनुभवले याचे वर्णन करणे. हे केवळ बाह्य स्वरूपाचे असते. यात आपण आपल्याला जाणवलेल्या त्यावेळच्या भावना पण व्यक्त करतो.

तिसरी पायरी आपण काही गोष्टी काही कारणास्तव व्यक्त करत नाहीत. दुसऱ्याचा राग येईल किंवा काही अनाहूत भीती. एकदा आपण याच्याही वर गेलोत की आपण पाहणे व त्याचे आपल्या मनावर बुद्धीवर झालेले परिणाम नेमक्या शब्दात व्यक्त करतो.

चवथी पायरी काही गोष्टी आपल्या मनाला इतक्या भिडतात की आपण नीट विचार करून त्या आपल्या जीवनाचा एक भाग बनवतो. हळूहळू त्या भिडलेल्या भावनाचे आपण प्रतिनिधी बनतो.

थोडक्यात आपण स्वतःला आपल्या नवनिर्मित अवस्थेत रुपांतरीत करतो.
ही प्रकिया सतत जगत राहणे म्हणजे अभ्यास करणे असे मला वाटते.....

मंगळवार, १९ मार्च, २०१३

काजळी: दुष्काजळी-निष्काजळी ....संजय पाटील



काजळी: दुष्काजळी-निष्काजळी 

संजय पाटील

काल रात्री उशिरा सहजच मोबाईल वर फोटो बघत होतो आणि ह्या माझ्या बैल जोडीचा फोटो बघताना थबकलो. थोडा वेळ गंभीर विचारात पडलो. कारण ही तसेच होते. ही जोडी मी ९ एप्रिल २००७ ला श्रीपतरायवाडीच्या अनंत शिंदे कडून विकत घेतली होती. बैलाची पारख करण्यासाठी मी, माझा मोठा भाऊ अरुण पाटील व आमचे स्नेही कलाप्पा ढगे ला शिंदेच्या शेतात सोबत नेले होते. कलाप्पा दातावरून बैलाची पारख सहज करायचे. या जोडीवर मी चार वर्ष शेती केल्यावर बरोबर दोन वर्षापूर्वी याच मार्च महिन्यात २०११ ला ही जोडी मी रेणापूर च्या बाजारात विकून शेतीच्या बाहेर पडलो. माझा गडी प्रकाश ने यांना लेकरा सारखे सांभाळले होते. मी विचार करतच झोपलो कि आता हि जोडी कोठे आणि कोण्या अवस्थेत असेल की मला 'मनी वसे ते स्वप्नी दिसे' याचा प्रत्यय आला. या जोडीतील काजळ नावाचा बैल माझ्या स्वप्नात आला व म्हणू लागला "काय मालक, काय चाललय? तब्येत फार सुधारलेली दिसते." मी म्हणालो "मज काय, मला चार खुटाची जहागिरी मिळालीय खादाडायला, तब्येत तर सुधारणारच ना. बर जाऊ दे, हे सांग तू ईतका खंग्लास कस काय?"

काजळ " हे बेस हं मालक, तुमी मंजी चंद्रया लोकांच्या नादाला लागून शेतीच्या बाहेर पडलात अन चार खुटाची जहागिरी गाजवायलात आन आमची मंजी चांगली खात्या गव्हाणीची एक खुटी तोडून दुष्काळयाच्या हवाली केल्यावर खंगनार नाय तर काय? माझा जोडीदार मागल्या सालातच खंगून मेला. मी बी उस्मानाबाद जिल्यातल्या चारा छावणीवर शेवटच्या घटका मोजत आहे."

मी हळहळत म्हणालो "अरेरे, लय वाईट झाल, कुठे फेडू मी हे पाप."

काजळ "जाऊ द्या मालक नशिबच फुटक आमच. नव्या धन्याच्या गावात दुष्काळान काई पिकल नाय अन वरून चारा-पाणी नाई म्हणून मला व त्याच्या दोन म्हशीला १७ कि.मी. लांब या छावणीवर आणल पण इथ बी आमच्या दुर्देवाचा फेर संपला नाही. आमाला इथ रोज १५ किलो उसाचे वाडे व प्यायला गढूळ पाणी मिळत. रोज रोज वाडे खाऊन ते वेटरन-याच्या भाषेत काय म्हणतात, हं आमच्या शरीरात ओक्झालेठच प्रमाण वाढून हाड पार ठिसूळ झालीत. म्हशीला दुग्ध ज्वर कवचाच झालाय. मला धन्याची लय कीव इतिया. हातच पिक बी गेल अन दुध बी बंद झाल. लय कुत्तरओढ झालीय बिचार्याची.

मी महनलो "अरेरे, लय वंगाळ झाल बग."

काजळ "मालक, तो तुमचा गाडी प्रकाश आता कुठे असतो? लय माया लावली हुती त्यासन आमाली" मी म्हणालो " अरे तो आता कुठे सालान राहात नाय. त्याच्या पोरांन, बाळू ने फायनान्स टाकलाय आंब्यात. मस्त गाडीवर वसुली करत फिरतो त्याचा पोरगा अन प्रकाश तुमच्या आशिर्वादान आरामात जगतूया."

काजळ "मालक एक सांगायचं राहिलाच की, ते शिंदेच्या शेतात आमच्या दाताची पारख करणारे ते तुमचे स्नेही आलते आमच्या छावणीवर परवाच्या दिशी. म्या लांबूनच ओळखल त्यास्नी." मी म्हणालो "अच्छा अच्छा, कलाप्पा होय मी वाचला होता त्यांच्या दौ-याच्या टाईम टेबल. वेळेचे फार पक्के आहेत ते. कुठेही अगदी १० वाजून १० मिनिट व ३५ सेकंदचा काटा न हलु देता म्हंजे आयडियल टाईम ला जातात." काजळ " मालक, म्या त्यास्नी लय हाक मारल्या हंबरून पण कश्याच काय ते आपल मश्गुल होत ब्यानरबाजी व फोटोबाजीत. म्या म्हणल आपल्या जुन्या मालकाचे स्नेही आलेत, जर लक्ष दिल असत तर वशिलेबाजी करून आपला चारा तर वाढवून घ्यावा. पण छे."

मी म्हणालो "अरे, ते आता फार मोठे पुढारी झालेत. थोरामोठ्याची वंश परंपरा आहे त्यांना. वरून ३-४ गॉड फादर १-२ गॉड मदर. ते कशा पाई लक्ष देतील तुझाकडे."

काजळ " म्हंजी सब घोडे बारा टक्के म्हण्याच तर."

मी म्हणालो "अरे तस काई नाय. काही मनस्वी लोक आहेत या दुनियेत. जस की हिंगोलीचे १०५ जनवार खाटकाच्या दारातून काढून आपल्या शेतात जगवणारे सुभाष मगर असोत की सिन्नर चे सुनील पोटे ज्यांनी कृषक मित्राच्या माध्यमातून गावात देव नदीवरली ब्रिटीश कालीन नाले बंधारे दुरुस्थ करून नंदनवन केल किंवा उस्मानाबाद जिल्हातील कवठ्याचे सेवाग्रामचे विनायक पाटील असोत. अरे आमच्या तालुक्यात प्यायला पाणी तरी आहे कारण या मागे खडतर परीश्रम आहेत गेल्या दोन तपात आदरणीय बाबूजींचे ज्यांनी कृषक पंचायतच्या माध्यमातून ८९ गावात पाणलोट व वाटर शेड च्या साह्याने जलस्तोत्र जिवंत ठेवले. आंब्यात प्यायला पाण्याची भीती नाही कारण स्वर्गीय डॉं.विमलताई मुंदडा यांनी त्यांची वटी काळवटी कायम स्वरूपी आमच्यासाठी भरून ठेवली आहे."

काजळ "मंग मालक हे कलाप्पा सारखे लोक असे का वागतात?

मी म्हणालो " अरे त्यांनीही बरेच प्रश्न मार्गी लावलेत तुमच्यासाठी. जस की छावानिचालकास आता अनामत भरायची गरज नाय. तुमच अनुदान ३२ वरून ५० रुपये केल." काजळ " मंजी आदी गर्दाड करायचं अन मग त्यात आमाली ढकलून वरून थोडी माती टाकायची, असच न. ही मंजी 'फुकटची कडी वाढायला पुढी पुढी, अन विकतचा भात आखडता हात' अस झालाय"

मी महनलो "अरे बाबा मी त्यांच्या वतीन तुझी माफी मागतो मंग तर झाल."

काजळ " माफी मागण्याचा प्रश्न नाही मालक. पण त्या दिशी पासून माणसाचा एक गुण कळला. तुमास्नी राग येणार नसाल तर सांगतो."

मी म्हणालो " सांग बाबा, हल्ली मला राग येत नाय कारण माझे सुध्धा तुझ्यासारखेच ठेचलेत परिस्थितीने."

काजळ "सांगतो तर नीट ऎका. अहंकार, सत्ता आणि स्पर्धा याची आग-धग माणसाच्या मनाल सतत तगमगत ठेवते. मानस माणसाला परावलंबी बनवतात जे लय भीषण असते.आमच्या सारखे पशु-पक्षी समूहान राहतात पण अहंकार, सत्ता किंवा पैसा याच्या जोरावर एकमेकाला एकमेकाचे गुलाम बनवत नाहीत.आमच हे समूह जीवन हे अध्यात्म-सत्तेच नैसर्गिक प्रकटीकरण असत. ही तुमची सरकारी व्यवस्था शेतक-याला कायम याचक बनवण्याचं दृष्ट षड्यंत्र रचते.कधी कर्जमाफीच्या नावाखाली तर कधी खात-बियाणाच्या अनुदानाच्या नावाखाली तर कधी चा-याच्या नावाखाली. त्यास्नी कायमच पंगुत्व आलय या मानसिकतेने. हे पराव्लम्बित्वच आपली नियती व या नियतीची कुत्तरओढ म्हणजेच या बळीराजाच जीवन. अहंकार, सत्ता आणि स्पर्धा या तीन घटकातून विषारी बनलेल्या या व्यवस्थेतून मधुरसच निघत नाय. कायम विखारी योजनाच बाहेर पडत आहेत. त्यामुळेच ७०-७० हजार कोटीचे सिंचनाच्या व कर्जमाफीच्या नावाखाली यांनी आमच शेण खाल्ल. सिंचनाच पाणी इंडिया बुल्सला, पण या खंगलेल्या देशी बुल्सच काय? हे मंजी 'सतीच्या घरी बत्ती अन शिंदळीच्या घरी हत्ती' अशी अवस्था हाय. शेतक-या बराबर आमचीही वाताहत झाली. मंग येतात छावणीवर, कलाप्पा सारखे आमचेच काही दात पारखी, थोरामोठ्यांचा वारसा घेऊन, याचं पापक्षालन करायला, यांनी शेण खाऊन हगलेल टोपल भर मैला घेऊन, गळफास लागलेल्या बळीराजाच अंगण सारवायला! या कलाप्पा सारख्या लोकांच वागण मंजी 'हिडग्याची व्याली गाय, खांद्यावर वासरू जत्रेला जाय' अशी झाली आहे. दुष्काळात यांचा दारात खितपत पडलेला हा बळीराजा एक न एक दिवस यांच्या पाठीत एटन घातल्याशिवाय राहणार नाही. महादेवाच्या दारातील नंदी मी, यांच्या दारात शेवटच्या घटका मोजताना गेल्या एक तपात आत्महत्या केलेल्या १०५६१ बळीराजाच्या आत्मशांती साठी एकच प्रार्थना करतो 'ओम नमो शिवाय!ओम नमो शिवाय!!२०१४ चे सरकार नसावे न.मो.शिवाय!!! जय हिंद जय गुजराथ!!!!"

असे म्हणून काजलने दम तोडला व माझ्या स्वप्नाचा सुध्दा दम तुटला!

तोपर्यंत सकाळ झाली होती, दारात अग्रोवन आला होता. मी रोजच्या सारखाच दुष्काळ गाथा वाचत बसलो.

काजळ खरोखरच काजळ होता! डोळ्यात ज्ञानांजन घालून गेला!! काळजात कायमची काजळी कुप्पी ठेवून गेला!!!