शुक्रवार, २७ एप्रिल, २०१२

ती आई होती म्हणुनी......अरुणाचल २


दिब्रुगड येथे महालयामध्ये आमची निवासाची व्यवस्था होती. सतत पडणारा पाऊस त्यामुळे बाहेर फिरणे जवळपास अशक्य. वाचन खूप करत होतो. या काळात सर्वात मोठी साथ होती माझा मित्र योगेश झोपेनी दिलेल्या मस्त गाण्याच्या कॅसेट्स व माझ्या आईने घेऊन दिलेल्या कॅसेट प्लेयरनी.


ग्रेसच्या कविता आणि जगजितसिंगांच्या गझला ह्या माझ्या नित्याच्या साथीदार बनल्या.


माँ सुनाओ मुझे वो कहानी,
जिसमें राजा न हो न हो रानी,
जो हमारी तुम्हारी कथा हो,
जो सभी के ह्रदय की व्यथा हो.

गंध जिसमें भरी हो धरा की,
बात जिसमें न हो अप्सरा की, 
हो न परियां जहाँ आसमानी,
माँ सुनाओ मुझे वो कहानी.


दिब्रुगडच्या ब्रह्मपुत्रच्या घाटावरून काही प्रवास जीपने ब्रम्हपुत्रच्या पात्रातून तर काही प्रवास बोटीने( फेरी) करत सकाळी ७ वाजता निघालेलो आपण नक्की कधी शिलापथारला पोहोंचू हे सांगता येणे कठीणच. माझ्या अनुभवानुसार कमीत कमी तीन तास तरी नक्की लागतात. शिलापथारला पोहोंचले की पहिले काम दापोरीजोला जाणाऱ्या बसचे तिकीट आरक्षित करणे. शिलापथार अरुणाचल व आसामच्या सीमेवरील एक छोटेसे गाव. दापोरीजोला जाणाऱ्या तशा दोन बस. एक अरुणाचल राज्य परिवहन निगमची, त्याला ट्रान्सपोर्टची बस म्हणतात तर दुसरी खाजगी वाहतुकीची आराम बस. ज्याच्यात जागा असेल त्यात बसायचे. सकाळी दापोरीजोहून जी बस असायची त्या बसने जायचे. कधीकधी बस येतच नसे मग शिलापथारच्या एखाद्या लॉज मध्ये राहायचे. त्यावेळी स्वच्छता,आरोग्य ह्या गोष्टी आमच्या विचार कक्षेच्या बाहेर.

दुपारी मस्त DBS (दाल,भात,सब्जी)वर ताव मारायचा, इकडे तिकडे फिरत बसायचे. सायंकाळी ५ वाजता शिलापथारहून बस निघायची. बसमध्ये कोंबड्या,मासे,वेगवेगळे सामान सगळे काही असायचे. 

बस ८ किलोमीटर पुढे गेली की लिकाबाली चेकपोस्ट. इथून अरुणाचल सुरु होणार. चेकपोस्ट म्हटल्यावर मला पहिल्यांदा थोडं आश्चर्य वाटले. एखादा पोलीस मग बसमध्ये चढून आतील  अरुणाचली बंधू सोडून इतरांचे इनरलाइन परमिट तपासणार. अरुणाचलमध्ये जाण्यासाठी आपल्याला रीतसर अरुणाचल शासनाची परवानगी घ्यावी लागते. ईशान्य भारतातील नागालँड,मिझोरम व अरुणाचल या तीन राज्यात प्रवेश करण्यासाठी (ILP) ही परवानगी लागते.इंग्रजांनी हा सुरु केलेला कायदा आपण पुढे चालूच ठेवला. या बद्दल बरेच वादविवाद आहेत.


एकदा इनरलाइन परमिट तपासणी झाली की बस अरुणाचलच्या डोंगररांगातून जाऊ लागते नागमोडी वळणाने. सरळ रस्ता क्वचितच.
 डोंगरातून खूप परिश्रमाने निर्माण केलेले हे रस्ते म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे देशासाठी एक खूप मोठे योगदान आहे. पावसाळ्यात मात्र हाल होतात. डोंगरच्या डोंगर कोसळतात. रस्ते पूर्ण बंद. वायुमार्गाने फक्त रसद पुरवठा आणि बऱ्याच वेळा तो पण बंद असे. एका पावसाळ्यात जवळपास एक महिना रस्ते बंद होते. फक्त भात कधी तर कधी फक्त बटाटे हे आमचे जेवण असे.

निसर्गाचा एक वेगळाच सुगंध आपल्याला इथे अनुभवता येतो. खोल दऱ्या, उंच पर्वत आपली साथ कधीच सोडत नाहीत. अरुणाचलमधील लिकाबाली हे पहिले गाव. मालिनीथान (Malinithan) मंदिर इथून एक किलोमीटर वर. इथे काही पुरातनकालीन (महाभारत) अवशेष पहावयास मिळतात. अशी आख्यायिका आहे की मालिनीथान येथे भीष्मकनगरहून  द्वारकेला जाताना  नवीन लग्न झालेल्या श्रीकृष्ण व रुक्मिणीने पार्वती मातेची प्रार्थना केली. पार्वती मातेनी त्यांनी एक हार दिला. तो श्रीकृष्णाला खूप आवडला. श्रीकृष्णाने पार्वती मातेची सुचारू मालिनी (Sucharu Malini", or a lady who strings garlands beautifully ) म्हणून स्तुती केली. त्यावेळी पासून या स्थानाचे नाव  मालिनीथान असे पडले.

लिकाबालीनंतर पुढचा थांबा येतो व सगळे लोक बस मधून खाली उतरतात. मी पहिल्यांदा गेलो त्यावेळी वाटले एखादा धाबा असेल पण खाली  उतरून पाहतो तो समोर एक मंदिर होते. अरुणाचलमध्ये असे अनेक स्वयंभू शिवलिंगाचे मंदिर आहेत. दापोरीजो जवळचे मंगामंदिर तर खुपच अप्रतिम आहे. हिमालयात निवास असणाऱ्या भोलेनाथाचा आशिर्वाद घेऊन.पुढची अवघड यात्रा सुरक्षित व्हावी म्हणून सर्वांनी प्रार्थना केली व आमचा प्रवास पुढे सुरु झाला.

असे खुपदा अनुभवायास मिळते की उत्तरेकडून दक्षिण टोकापर्यंतचा भारत रामाने जोडला. पूर्वेकडून पश्चिमेपर्यंतचा भारत कृष्णाने जोडला तर समुद्रसपाटी पासून ते उंच हिमालयाच्या पर्वतशिखरांपर्यंतचा भारत शिवशंकराने जोडला.

अरुणाचलच्या या पर्वतीय रस्त्यावरून बस चालवणे खुपच जिकीरीचे काम. खुपच सतर्क रहावे लागते. वळणावर समोरून येणाऱ्या गाडीचा वेध तिच्या प्रकाशाने घ्यावा लागतो. अरुणाचलचे क्षेत्रफळ ८४ हजार वर्ग किलोमीटर व लोकसंख्या १४ लाखाच्या आसपास. मनुष्यवस्ती खुपच तुरळक व खूप अंतरावर. त्यामुळे दहा तासाच्या प्रवासात काहीच गाव दिसतात. बसार हे त्यातल्या त्यात मोठे गाव. सकाळी सहाच्या आसपास आपण दापोरीजोमध्ये पोहोचतो. मारो हे छोटेसे गाव सोडल्यानंतर काही अंतरापासून आपला प्रवास सुबांशिरीन सोबत सुरु होतो. 

अरुणाचलच्या बहुतेक जिल्ह्यांची नावे त्या भूभागातून नद्यांच्या नावावरून दिले आहेत. त्याच प्रमाणे इथल्या गावाची नावे म्हणजे इथल्या बंधूंची आडनावे. मारो बस्ती मध्ये राहणाऱ्या सर्व बांधवांची आडनावे मारो. 
मुलांची व पुरुषांची नावे मुख्यतः त किवा म पासून सुरु होतात उदा.ताके,तामो,तानिया,तागे, मार्को,मालार इत्यादी  तर मुलींची व महिलांची नावे मुख्यतः य पासून. याबी, यांनी, याकब, यादे इत्यादी. वडिलांचे नाव लावण्याची पद्धत इथे नाही.
गावातील मुलं मुली एकमेकांची बहिण भाऊ व गावातील प्रत्येक आईच्या (आने) वयाच्या महिलेला मुलं आईच म्हणतात. 

आबो म्हणजे वडील तर आबोतानी हा त्यांचा  आद्य पिता. सर्वं अबोतानीच्या वंशजांचे दोनि (सूर्य ) व पोलो (चंद्र) हे देवता. दोनि आई आहे तर पोलो वडील आहे. निसर्गाच्या सहवासात राहणारे हे बांधव निसर्गाचेच पूजक असणार.



आदित्यांत महा-विष्णु ज्यातिष्मंतांत सूर्य मी । मरीचि मुख्य वायूंत मी नक्षत्रांत चंद्रमागीत्ताई २१॥
मी एकाक्षर वाणींत महर्षींत असे भृगु । जप मी सर्व यज्ञांत मी स्थिरांत हिमालय गीत्ताई २५ ॥






भारतवर्षात एकूणच आई व मुलाचे नाते फारच वेगळे.  तिच्या शरीराचा आपण एक भाग असतो. भारतात्तील आई मुलांच्या जोड्या पहिल्यातर आपल्याला लक्षात येईल की आईचे स्थान भारतीय अध्यात्मात तर महत्वाचे आहे पण इतिहासात ते खुपच उठून दिसते. गणपती -पार्वती, हनुमान-अंजनी, कृष्ण-यशोदा, शंकराचार्य व त्यांची आई,जिजाऊ-शिवबा, शाम व त्याची आई, विनोबा व त्यांची आई. अशा आई मुलांच्या जोड्यांनी सर्वच क्षेत्रात एक नवीन आदर्श ठेवला. मी काही माझ्या पंजाबी मित्रांना विचारले की खरे कशा मुळे पंजाबातील दहशतवाद संपला? त्यांचे उत्तर होते, “ पंजाबातील आईंमुळे!!!”

मला कधी कधी वाटते आपल्या देशातील आईंमुळे देश एकसंघ राहिला व कुटुंबे एकसंघ राहिली. आई जर दुर्बल झाली तर घर व देश पण दुर्बल होईल.
अरुणाचली आई पण याला कशी अपवाद असेल. अरुणाचली घराचा कणा म्हणजे आई.

गम्मत म्हणजे अरुणाचलात लग्नपद्धती पण खूप वेगळी आहे. पुराणकाळात आपल्याकडे सर्वात श्रेष्ठ गोधन समजले जायचे. 

अरुणाचलमध्ये श्रीमंती ठरते ती त्यांच्याकडे असण्याऱ्या मिथुनच्या संख्येवर. मिथुनचे अरुणाचली बांधवांच्या आयुष्यातील स्थान खूप महत्वाचे. एका मिथुनची किंमत काही दश सहस्त्रात. एखाद्या मुलीशी आपल्या मुलाचे किवा मुलीचे लग्न लाऊन द्यायचे असेल तर त्या मुलीचे वडील मागतील तेवढे मिथुन लग्नात त्यांना द्यावे लागतात ही अरुणाचली रीत.

एक गंमतीदार किस्सा ऐकिवात आहे. पंडित नेहरू व इंदिराजी अरुणाचल मधील झिरो या गावी गेले होते. त्यांचे तिथे खूप जोरदार स्वागत झाले. झिरो गावच्या गावप्रमुखाला इंदिराजी खूप आवडल्या. गावप्रमुखाचे वय साठीच्या आसपास असेल. त्यांनी पंडितजींना विचारले,


“इंदिराजींचे लग्न माझ्याशी लाऊन द्याल का?”


त्याबदल्यात गाव प्रमुख पंडितजींना शंभर मिथुन देण्यासाठी तयार होते.

मी दापोरीजो मध्ये रहात असताना खूप जवळून अनुभव घेता आला या सर्व लोकांचा. एकदा काही बांधवांना आमचे कार्यकर्ते बंगाल मध्ये घेऊन गेले. कोलकत्याच्या रेल्वेस्टेशन वर एका बांधवाची बॅग चोरीला गेली.
“कुठे ठेवली होती?” असे विचारल्यावर त्याने सांगितले,
“वहाँ कोने मे रखी थी”
“आपका ध्यान नही था क्या?”
“हमने यह सोचा भी नही था न, की कोई बॅग उठायेगा.” 

अगदी निरागसपणे त्याने उत्तर दिले.

त्याच्या बस्ती मध्ये कुठल्याच घरांना कुलूप नसतात. चोरी हा प्रकार बस्तीतल्या लोकांना माहित पण नव्हता.



कुपोरीजो मधील विवेकानंद केंद्राच्या प्राथमिक शाळेतील मुले खुपच गोड दिसायची. त्यांचे हिंदी बोलणे पण फार भारी. तशी फार इरसाल ही पोरं. साप, पक्षी, विंचू हे सहज पकडायची. जंगलाचे ते राजेच होते. साठच्या दशकात रामकृष्ण मिशनच्या शाळांमध्ये अरुणाचलच्या विविध व खूप अंतर्गत भागातून मुलांना सरळ हेलीकॉप्टरने आणले जायचे. त्यातील काही मुले पुढे अरुणाचलचे मंत्री, मुख्यमंत्री व खासदार झाली. असेच अप्पर सुभांशिरीनच्या अतिअंतर्गत भागातून मुलांना शिकण्यासाठी कुपोरीजोच्या शाळेत आणले जायचे.

मारो ही एक अशीच दुरस्थ बस्ती. जवळपास ३० किलोमीटर दूर.
तिथला तागे हा शिकण्यासाठी कुपोरीजो मध्ये होता. तागेचे वडील तो काही महिन्याचा असतानाच देवाघरी गेले होते. त्याच्या आनेची (आईची) इच्छा होती तागेनी खूप मोठे व्हावे. दिसायला तागे अगदी बाल हनुमानाचे रूप. खुपच मस्त दिसायचा.

विवेकानंद केंद्राच्या शाळांच्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा होत असत. ओयानच्या शाळेत झालेल्या लांब पल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धेत पहिलीतील तागे मारा एक स्पर्धक होता. त्याची स्पर्धा होती त्याच्या पेक्षा वयानी खूप मोठया मुलांशी. स्पर्धा सुरु झाली तागे मारा मात्र शेवट पर्यंत धावला व शर्यतीचे सहा किलोमीटरचे अंतर त्याने न थांबता पूर्ण केले. तागे मारा त्या दिवसा पासून सर्वं विवेकांनद केंद्रांच्या शाळेत हिरो झाला होता. दापोरीजोची अनेक मुले ओयानच्या शाळेत शिकत होती. त्या शाळेचे मुख्याध्यापक श्री.पांडे होते. मुलांनी तागेला सांगितले की मुख्याध्यापकांशी ओळख करून देताना त्यांनी त्याचे स्वतःचे नाव सांगायचे पांडे म्हणून.

मुख्याध्यापकांनी तागेला नाव विचारले. त्याने सांगितले पांडे मारा !!! आणि त्या दिवसापासून सगळे त्याला पांडे म्हणू लागले. मी कुपोरीजो मध्ये अधूनमधून राहायला जायचो. नेत्रतपासणी शिबिरानंतर मला आता प्रवासासाठी मोटारसायकल पण मिळाली होती. पांडे व त्याच्या तीन मित्रांशी माझी पण खूप मस्त मैत्री झाली होती. ताई गंगो,मित्ती गंगो,डॅनी मार्दे हे पांडेचे जिगरी दोस्त. ताई गंगो,मित्ती गंगो दोघे भाऊ दापोरीजोचे तर  डॅनी मार्दे दुम्पोरीजोचा. या तिघांचा जन्म थोडया सुधारलेल्या भागातील. फार जंगली जीवनाचा अनुभव नाही. घरचे जीवन पण सुशिक्षित व समृद्ध होते. एकनाथ वसतिगृहात दुसरीचे मुले रहात. या चौघा जणांचे कॉट एक सलग. मी कुपोरीजो मध्ये असल्यावर या चौघांशी निदान अर्धा एक तास तरी रात्रीच्या जेवणानंतर गप्पा मारत असे. ते मला प्रसादजी सर म्हणायचे. त्यांच्यामुळे मला शाळेतील व अरुणाचलातील  बऱ्याच गोष्टी पण कळायच्या.

“पांडे, आप इतना तगडा कैसे है? बहोत दुध, मक्खन, घी खाता होंगा?”

“नही न सर, हमलोग मे, दुध सिर्फ माँ का ही पिते है. जिसका दुध पियेंगे वो माँ बन जाती है. इस वास्ते तो हम गाय का दुध नही पिते.”

सृष्टीशी या भागातील बांधवांचे नाते पण फार वेंगळे. गाय व मिथुनचे हे लोक दुध पीत नाहीत कारण जिचे आपण दुध पितो ती आपली आई होते मग तिचे मांस नाही खाता येणार, त्यांचा बळी नाही देता येणार कुठल्याही पूजेत किंवा सण-समारंभात.एक झाड जर जंगलातील तोडले तर एक तरी नवीन झाड लावले पाहिजे हा नियम.

९ मार्च १९९७, पूर्ण खग्रास सूर्यग्रहण ईशान्य भागात दिसणार होते. मला सूर्यग्रहणा बद्दल प्रचंड आकर्षण होते. पूर्ण खग्रास सूर्यग्रहण आणि ते ही अरुणाचल मधून पहायला मिळणार या मुळे मी खूप खुश होतो. तसे दोन दिवसांपासून मी कुपोरीजी मध्ये ठाण मांडून बसलो होतो. संध्याकाळी जेवण झाल्यावर मी सर्व मुलांना ग्रहणाबद्दल माहिती देत असे. पिन होल कॅमेरा, ग्रहण पाहण्यासाठी खास प्रकारच्या चष्मे पण मी मागून घेतले होते. ग्रहणात उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे पहायचे नाही, नाहीतर डोळे खराब होतील. शिक्षक हे सगळे सर्वं विद्यार्थ्यांना बजावून सांगत होते. आदल्या दिवशी दुपारी सूर्यग्रहणावर खूप छान माहिती दूरदर्शनवर दाखवण्यात आली होती. मुलं प्राथमिक शाळेतील असले तरी त्यांना एकूण बऱ्यापैकी संपूर्ण सूर्यग्रहणा बद्दल माहिती झाली होती. दुसऱ्या दिवशी मी माझ्या मदतीला थांबण्यास पांडे व त्याच्या मित्रांना सांगितले. मुख्याध्यापक तामिळनाडूच्या कुमारवेल सरांनी झोपण्याआधी सर्वं मुलांना परत एकदा सूचना दिल्या.

मी पण माझ्या निवासकक्षात जाऊन शांत झोपी गेलो. अचानक रात्री कुमारवेल सरांनी माझ्या खोलीचा दरवाजा जोरात ठोठावला. काही क्षण मला काही कळलेच नाही. स्वप्न आहे की भास.

“प्रसादजी उठो ...जल्दी उठो”  कुमारवेल सर जोरात हाक मारत होते.

“क्या हुआ सर ?” मी दरवाजा उघडत विचारले.

“चार बच्चे होस्टेल मे नही है”

“क्या ?”

“सेकंड के चार बच्चे होस्टेल मे नही है”

लंबोदरजीनां (वार्डन) रात्री १२ वाजता, झोपण्या पूर्वीची शेवटची तपासणी करताना लक्षात आले की 
चार मुले नाहीत. आम्ही सर्वांना जागे केले. शाळेच्या सर्व भागात तपासणी सुरु केली. कुठही मुलांचा ठिकाणां नाही.

“कौन कौन बच्चे नही है ?” मी वार्डनला विचारले.
“पांडे मारा, ताई गंगो,मित्ती गंगो,डॅनी मार्दे”
“क्या, ये सब लोग नही है ?”
“हा सर वो ही लोग है”

बराच वेळ शोधल्या नंतर आम्ही शाळेबाहेर शोधण्याचा निर्णय घेतला. तीन दिशांना तीन गटानी जायचे ठरले. मी पण एका मोठया मुलाला घेऊन मोटारसायकलहून दापोरीजोच्या दिशेनी निघालो. मध्यरात्रीचा एक वाजला होता. मी सावकाश झाडांमध्ये मोटारसायकलचा प्रकाशझोत टाकत हळूहळू पुढे जात होतो. साधारण ४/५ किलोमीटर गेल्यावर अचानक मागे बसलेला मुलगा ओरडला,

“ सर , वो देखो वो लोग भाग रहे है.”
“कहा है? .....ठीकसे देखो”
“वो देखो न सर, नीला शर्ट है और वे भाग रहे है”

अरुणाचली मुलांची नजर फारच जबरदस्त. मी गाडी थांबवली. मागे बसलेला मुलगा उतरला व सरळ झाडांमध्ये घुसला. ही मुलं प्रचंड निर्भीड, कशाची भीती अशी नाही. मी गाडी लावून त्याच्या मागे धावत निघालो. मी जोरात ओरडलो,

“पांडे रुको ...भागो मत.”

तोपर्यंत माझ्याबरोबर आलेल्या मुलाने पांडेला पकडले होते. पांडेला पकडले हे पाहताच ताई गंगो,मित्ती गंगो,डॅनी मार्दे हे पण पळायचे थांबले.

“अरे कहा भाग रहे थे इतनी रात मे? सब लोग परेशान हो गये ना”

माझ्या या बोलण्याला फक्त माना खाली करून त्यांनी प्रतिसाद दिला. मी अनेक प्रश्न विचारत होतो पण एक जण पण तोंड उघडायला तयार नाही. शेवटी आम्ही पाच जण गाडीवर बसलो. ताई गंगो,मित्ती गंगो फारच लहान होते त्यांना पेट्रोलच्या टाकीवर बसवले तर डॅनी,पांडे यांना मागे. माझ्या बरोबर आलेल्या मुलाला तिथेच एका घरात थांबायला सांगितले. गाडीवर पण मी त्यांना अनेक प्रश्न विचारत होतो पण एक शब्द बोलत नव्हते. शाळेत कित्येक तास गप्पा मारणारे हेच का? हा प्रश्न मनात पडत होता.
एकदाचे शाळेत पोहोंचलो. कुमारवेल सर प्रेयर हॉल समोर काही मुलांसोबत उभे होते. गेल्या तासाभरा पासून ते खुपच अस्वस्थ होते. मुलांना पाहताच ते जवळ आले. पांडेला जवळ घेऊन विचारले,

“क्यू गया था ?”

मुलं चूप. एक दोनदा सरांनी विचारले पण पोर शांत. ताई गंगो मात्र जोरात रडायला लागला.
सर खुपच चिडले होते त्यांनी चांगला प्रसाद चारी जणांना दिला. पण बहाद्दर काही बोलायला तयार नाहीत. जोरजोरात मात्र रडायला सुरुवात केली. सर अजून चिडले. मग अजून प्रसाद. मग अजून रडणे.

शेवटी मी ताई गंगोला बाजूला नेले. शांतपणे त्याला विचारले,

“अभि आपको कोई भी नही मारेगा और डाँटेगा भी, सिर्फ बताओ क्यू भाग गये थे.”  

ताई व माझी जास्त दोस्ती होती. तो थोडा वेळ शांत होता व मग बोलू लागला,

“सर कल तो सूर्य ग्रहण है ना? पांडे की मां बस्ती मे रहती है. उसको तो यह मालूम नही है न? अगर उसने सुरज की तरफ देखा तो उसकी आँखे खराब हो जायेगी न सर ? पांडे ने हमलोग को ये बताया. फिर मित्ती बोला रात मे भागते भागते बस्ती मे जायेंगे और उसे ये बताके फिर वापस आयेंगे. फिर हम सब लोग तैयार हुये और पांडे के माँ को बताने के लिये बस्ती जाने के लिये भाग निकले.”

माझे डोके सुन्न झाले. मी ताईला माझ्या मिठीत घेतले. उठलो व लंबोदरजींना मुलांना पाणी व साखर द्यायला सांगून कुमारवेल सरांना घेऊन माझ्या खोलीत आलो. सरांना मुलांच्या पळून जाण्याचे कारण सांगितले. सरांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले.

दोन वर्षांनी मला केंद्राच्या सर्व शाळांच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी दिली. त्यामुळे दापोरीजो सोडून दिब्रुगड माझे मुख्यालय झाले पण महिन्यातून २४ दिवस अरुणाचल मध्येच प्रवास असायचा. मुख्यतः माध्यमिक शाळांची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे दापोरीजोला जाणे थोडे कमीच म्हणजे वर्षातून एकदा. पांडेनी चवथीची परीक्षा दिली होती व तो सुट्टीत घरी गेला होता. मी नेमका सुट्ट्यांमध्येच कुपोरीजोच्या शाळेच्या भेटीसाठी आलो होतो. मी सरांकडे पांडेची विचारपूस केली.

“क्या बताये सर बहोत दुःख की बात है. गये साल, एक दिन पांडे की मां स्कूल मे आई. वो बोलने लगी मेरे बेटे के साथ मुझे आज की रात सोने दो. आपने यहा तो ये नही चलता है न ? मैने बताया स्कूल का नियम है,ऐसा नही करने देते. वो बहोत रोने लगी.”

कुमारवेलसर खुपच भावूक व्यक्तिमत्व. ते सांगतांना त्यांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले.

“क्या करता सर बहोत समझाया पर वो बहोत रिक्वेस्ट करने लगी. मुझे तो बहुत दीकदारी थी. मेरा मन कहने लगा एक रात की तो बात है, सोने देंगे. फिर मैने भय्या को बताया की पांडे को नीचे लाओ. पांडे आने के बाद उसके माँ की और उसके सोने की व्यवस्था एक quarter मे की. सुबह उठकर उसकी माँ स्कूलसे चली गयी.”

आता मात्र सर चांगलेच रडत होते.

“दुसरे दिन पांडे का मामा आया और उसने कहा कल रात पांडे की मां का निधन हुआ.....मुझे तो बहोत अस्वस्थ होने लगा.पांडे को लेके वो लोग चले गये. रात भर मुझे नींद नही आई प्रसादजी.”

ती आई होती म्हणुनी घन व्याकुळ मी ही रडलो

त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे

खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता




रविवार, २२ एप्रिल, २०१२

देशाबद्दलचे अज्ञान, आपले एक मोठं राष्ट्रीय पापच नाही का?


अरुणाचल ......उगवत्या सूर्याचा प्रदेश. भारताच्या ईशान्येकडील अचंबित करणारे देखणे सौंदर्य. दर दहा कोसाला भाषा बदलते हे जर आजच्या जगात अनुभवायचे असेल तर नक्कीच अरुणाचलला गेले पाहिजे. भाषा, वेशभूषा, परम्परा, रीति यांमध्ये प्रचंड वैविध्य आपल्याला आजच्या युनिकोडच्या जगात पाहायला मिळते. 




उंच हिमालयाच्या कुशीत,घनदाट जंगलाचे पांघरून घेऊन सर्वदूर असलेल्या शांततेत मधुर संगीत निर्माण करत वाहणाऱ्या सरिता, जंगलातील जैविक संपत्तीबरोबर भूगर्भात दडलेले अपार भांडार, जलस्त्रोतांपासून हजारो मेगावॅट विद्युत निर्माण करण्याची क्षमता, इथल्या उंच पर्वतांमुळे संरक्षण दृष्ट्या अतिमहत्वाचा हा प्रदेश.

एकूणच ईशान्य भारत सर्वच दृष्टीने खूप महत्वाचा. या भागाची ९६% सीमा ही पाच देशांना लागून असलेली आंतरराष्ट्रीय सीमा. ३२ किमीच्या चिंचोळ्या भूभागाने तो आपल्या मातेशी जोडलेला. मग बलशाली ड्रॅगनची वाईट नजर नेहमीच त्याच्यावर असणार. १९६२ मध्ये या भागाच्या अर्ध्याच्या अधिक भूप्रदेशावर त्यांनी कब्जा केला. पण अतिप्राचीन परंपरेशी व संस्कृतीशी अतूट नाळ असलेल्या येथील लोकजीवनावर झालेल्या राष्ट्रप्रेमाच्या संस्कारामुळे,महामेरू हिमराजामुळे व  महाविस्तीर्ण ब्रम्ह-पुत्रमुळे माओच्या पुत्रांना इथून जावे लागले.

दांगेरीया बाबांची( शंकराची ),किरीतांची,हिडींबा,घटोत्कच, भीष्मक व रुक्मिणीची ही भूमी.. गुवाहाटीची कामाख्या ही कांचीकामकोटीच्या शंकराचार्यांची कुलदेवता. लाचीत बोर्फुकन (Lachit Borphukan)  
हा मुघलांशी मराठ्यांच्या छाव्यासारखा लढला.

अरुणाचलची राज्यभाषा हिंदी. आजही जुने लोक एकमेकांना भेटल्यावर जय हिंद म्हणून वंदन करतात. इतिहासातील काही अक्षम्य चुकांमुळे शापित नंदनवनापेक्षा ह्या सप्त भगिनीच्या प्रदेशात आपल्या बांधवांना जास्त जीव द्यावे लागले.  

विवेकानंद केंद्राचे एक वर्षांचे कन्याकुमारीत प्रशिक्षण घेऊन मला अरुणाचलमधील अरुणज्योती प्रकल्पा साठी नियुक्त केले. मुंबईहून कोलकत्ता मग गुवाहटी व तेजपूर तेथून दिब्रुगड असा ७० तासांचा प्रवास करून केंद्राच्या “ब्रिझी मेडोझ” या वास्तुत पोहोंचलो. स्वामी विवेकानंदांना अमेरिकेत ज्या पहिल्या घरात प्रवेश मिळाला त्याचे नाव होते  “ब्रिझी मेडोझ”. केंद्राच्या अरुणाचल प्रदेशाचे प्रवेशद्वार म्हणजे हे कार्यालय. 

काही कारणास्तव मला अरुणाचलात जाण्यासाठी दीड महिना वाट पहावी लागली. पहिला प्रवास होता तेजूसाठीचा. प्रचंड पाऊस त्यात नदीतून केलेला अनोखा प्रवास. दिगारू,लोहितचे अजब पात्र. प्रीतम मारो, याबी, याकब, मालार दिग्ली असे अनेक अरुणाचलचे अप्पर सुभांशिरीन  जिल्ह्यातील नव्या मित्रांबरोबर एक वेगळेच नाते जुळले.

“A” for अमेरिका ते “A” for अरुणाचल हा बद्दल घडला ते “A” for अण्णा एक ज्ञानप्रबोधिनीचे द्वितीय संचालक श्री अण्णा ताम्हणकर व दुसरे अण्णा हजारे यांच्यामुळे. पण हा विवेक माझ्यात आला ते माझ्या विवेक कुलकर्णी सरांसोबतच्या “प्रचीती” मुळे. “A” for अंबाजोगाईचा मी ३००० किमी च्या दापोरीजो गावात केंद्राच्या कामासाठी पोहोंचलो मे महिन्यात. 

दापोरीजो हे अप्पर सुभांशिरीन  जिल्ह्याचे मुख्यालय. कुपोरीजो हे दापोरीजो पासून रस्त्याने दहा किलोमीटरवर. दोन्ही गावांमधून वाहते सुभांशिरीन. कुपोरीजोला केंद्राची प्राथमिक शाळा, त्यात पहिले काही दिवस राहिलो. कृष्णकुमार हा मूळ केरळचा शिक्षक तिथे अरुणज्योतीचे काम करायचा. त्याच्या सोबत कामाचा अभ्यास सुरु झाला.

पहिल्या एक दोन दिवसानंतर शाळेपाठीमागच्या दुगी बस्तीत गावच्या प्रमुखाच्या (गाव बुढा) मुलाच्या लग्नानंतरच्या शुभेच्छा समारंभासाठी शाळेतील सर्व शिक्षकांना जेवणासाठी बोलावले होते. मी सर्वांसोबत गेलो. 

अरुणाचली घर बांबू व जंगलात मिळणाऱ्या तोकु पत्त्याची (पानांची )बनवलेली असतात. घराच्या मध्यभागी चूल असते. त्याच्या भोवती बसून पंगत चालते. मला  पहिल्या सहा महिन्यात एकदा पण मानवनिर्मित विजेचे दर्शन काही झाले नाही.


आमची पंगत मस्त सुरु झाली. पहिल्यांदा “अपांग” म्हणजे Rice Beer, आपल्याकडे चहा जसा आतिथ्याचे प्रतीक आहे तसे सगळ्या अरुणाचल मध्ये “अपांग”. “अपांग” विशिष्ट पद्धतीने घेतली की ती चढत नाही. माझा “अपांग” पिण्याचा पहिलाच प्रसंग. मी “अपांग” बद्दल बरेच ऐकून होतो. जर्मनच्या जगमध्ये किंचित काळसर “अपांग” मला दिली गेली. पहिला घोट घेतला थोडी आंबूसचव. पहिले काही घोट घेतल्यावर मला चढल्यासारखे वाटू लागले. “अपांग” पिण्याचा बराच आग्रह होतो. पुढे मी पट्टीचा “अपांग” पिणारा झालो.

“अपांग” नंतर जेवणाला सुरुवात झाली. भात, उकडलेली रस्साभाजी व मीठ असा मेनू. मस्त पोटभर जेवण झाल्यावर आम्ही दुगी परिवाराचा सस्नेह निरोप घेतला. कीर्र अंधारातून आम्ही चालत परत शाळेत निघालो. रातकिड्यांच्या आवाजाने आसमंत थोडे भय निर्माण करणारा होता. सोबत विजेरी गरजेची कारण पायामध्ये  कोणते  जंगली मित्र (साप, नाग, विंचू,इत्यादी ) येतील याची शाश्वती नाही. शेवटी आम्ही त्यांच्याच विश्वात राहत होतो. जाताना गप्पा चांगल्याच रंगल्या.

“क्यूं प्रसादजी कैसी लगी “अपांग” ?” एका शिक्षकाने विचारले.

“ठीक रही” मी उत्तर दिले.

“घुम रहा है क्या ?”

“नही तो” मी थोडे अधिकच विश्वासाने बोललो.

“आपने जो आज सब्जी खाई वो कैसी लगी ?”

“ठीक थी”

“पहले खाई है कभी ?”

“हां,बहुत बार खाई है”

“आपको समझा क्या, किसकी सब्जी थी ?”

“सोयाबीन चंक्स की थी”

“अरे सर, आपको थोडी गलतफहमी हुई ऐसा लगता है” शिक्षकाने थोडे हसतच उत्तरं दिले.

“क्यू क्या हुआ ?”

“अरे प्रसादजी वो सुअर के मास की सब्जी थी” शिक्षक हसत बोलला. त्याच्या बरोबर सगळे शिक्षक हसले.

मला मात्र अंबाजोगाईतील रस्त्यावर,गटारात असलेले डुकरे डोळ्यासमोर दिसत होती. मी एकदम शांत पणे माझ्या निवासस्थानी गेलो. पण मनातून आपण काय खाल्ले आहे हे काही जात नव्हते. नकळत मनातले तोंडात अवतरले. मळमळ सुरु झाली. दार उघडून आत सरळ स्वच्छता गृहात गेलो. एका पाठोपाठ एक अशा अनेक उलट्या झाल्या. पोटातले सगळे बाहेर पडले पण मनातले कसे निघणार ? खूप थकल्याने झोप लवकर लागली.

सकाळचे चार वाजले असतील. पक्ष्यांचा चिवचिवाट सुरु झाला. मला मात्र घडयाळ बंद पडले असे वाटले. सकाळच्या प्रात:स्मरणासाठी गेलो.शंकराचार्यांच्या त्या स्तोत्राने एक स्फूर्ती मिळाली. मनातील किंतु परंतु निघून गेले. त्यानंतर मी पुढील चार वर्षं जे समोर येईल ते ब्रह्मार्पणम् म्हणून सेवन केले. त्यातून फक्त पोटाचा आयुष्यभराचा विकार जडला पण सूर्याला आई मानणाऱ्या अरुणाचलच्या बंधूंशी व भूमीशी एक अतूट नाते जुळले.

काही दिवस कृष्णकुमारबरोबर कुपोरीजोत राहून काम केले. मला लोकांमध्ये राहून काम करायचे होते. दापोरीजो येथील श्री.दाक्पे यांच्या घरी अरुण-ज्योतीचे कार्यालय होते तिथे मुक्काम हलवला. जानिया सोकी सारखे मस्त सहकारी भेटले. एका जोशात काम करत होतो.

अरुणाचलमध्ये घराच्या अगदी मध्यभागी चूल असते व ती  कायमची प्रज्वलित असते. त्यामुळे घरात बरेच धुराचे साम्राज्य. यामुळे फार लवकर डोळ्याचे विकार व वृद्ध लोकांमध्ये मोतीबिंदूचे प्रमाण खूप पहावयास मिळते. विवेकानंद केंद्रांनी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे अभियान अरुणाचलभर सुरु केले. आम्ही दापोरीजो मध्ये जिल्ह्यातील लोकांसाठी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले. जिल्ह्याची लोकसंख्या चाळीस हजाराच्या आसपास. आयोजनासाठी बऱ्यापैकी खर्च येणार होता. काय करणार? आमच्या समोर मोठा प्रश्न होता.

केंद्राचे संस्थापक आ. एकनाथजींनी विवेकानंद शिलास्मारक उभे करताना मानसी एक रुपया स्मारकासाठी अशी योजना केली व त्यातून चार कोटी रुपये जमा झाली. आम्हाला चाळीस हजार पाहिजे होते. मी ज्या भागात होतो तेथे तागीन,आदी व हिल्समिरी जनजातीचे लोक होते. त्यांच्यात आजीला आने व आजोबाला आतो म्हणतात. आम्ही शाळेतून, महविद्यालयातून, शासकीय कार्यालयातून आवाहन केले की एका आने किंवा आतोच्या शस्त्रक्रियेसाठीचे एक हजार रुपये जमा करून त्यांनी एका आजी आजोबांना दत्तक घ्यावे. हे भावनिक आवाहन भावूक अरुणाचली बंधूंच्या हृदयाला भिडले. काही दिवसातच जिल्हाभरातून ४५ हजार रुपये जमले.

नेत्र शिबिराचा व्याप फारच मोठा होता. आधी सर्व जिल्हाभर प्रचार मग दापोरीजो येथे नेत्र तपासणी. त्यातून मोतीबिंदू असणारे रुग्ण सापडणे व त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून पुढे सात दिवस त्यांची सगळी काळजी घेणे. खूप मनुष्यबळ व रचनाबांधणी आवश्यक होती. केंद्राचे अनेक ज्येष्ठ जीवनवृत्ती दापोरीजो मध्ये दाखल झाले. शिबिराच्या दिवशी जवळपास हजारच्यावर रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्यातून ४७ जणांची  मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करायचे ठरले. महाविद्यालय व शाळेतील अनेक तरुण लोक मदतीला होती. आम्ही पूर्ण जिल्हारूग्णालयच ताब्यात घेतले. त्याचा पूर्ण कायापालट केला. एकदम टाप टीप झाले सगळे. दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया सुरु झाल्या. त्यानंतर  आने व आतोंची काळजी घेणे फार महत्वाचे होते.

जेवण, डोळ्यात औषध टाकणे, स्वच्छता इत्यादि २४ ‍‍‌‍बाय ७ असे कामाचे नियोजन करावे लागले. रात्री सर्व काम झाल्यावर गप्पा रंगत.

सगळे कार्यकर्ते व अरुणाचली बंधू अगदी कुठलाही आड पडदा न ठेवता गप्पा मारत. तसे त्यांच्यात आणि आपल्यात त्यांनी कधीच पडदा निर्माण केला नाही पण आपल्याच अज्ञानामुळे आपण कधी नकळत तर कधी राज्यकर्त्यांच्या अक्षम्य चुकांमुळे पडदा निर्माण केला.

चर्चेचा सूर होता .....

“सर हम तो भारतीय ही नही है न ? जब भी हम लोग दुसरे राज्य मे जाते है तो लोग हमे चीनी, नेपाली,जपानी कहते है.... हम लोग तो बरसोंसे यही सुनते आये है. अगर बतायेंगे की हम लोग नॉर्थईस्ट से आये है तो वो कहते है, कहा है नॉर्थईस्ट? .....बहोत सारे लोगोंको यहा के राज्य के नाम भी मालूम नही है. राज्योंकी राजधानी तो दूर की बात. हमारे लोगोंकी भाषा, परंपरा, सभ्यता के बारेमे तो बहोत थोडे लोगोंको मालूम है. अरुणाचल से जादा तो सबको अमरीका के बारेमे मालूम है. बडे बडे लोगोंको भी  बहोत साधारणसी बाते मालूम नही है न!  सर, फिर बताओ हम कैसे भारतीय है? अपने घर के लोगोंकी तो पहचान नही, ऐसा तो नही होता है न सर?”

मी शांतपणे सगळे ऐकत होतो. काय बोलणार यावर? हे बऱ्यापेकी सत्य होते.

“फिर हमारे बच्चे ये सुनकर बिथर जाते है ....और गलत रास्ते पे जाते है.बंदूक और खून बहानेसे कूछभी नही होने वाला यह तो हम लोग भी जानते है. बाहर के देशके लोग तो उनको भडकाते रहते है.”

आज ईशान्य भारतात ६०च्या वर अतिरेकी संघटना आहेत. एक कोटीच्या वर २५च्या आत येथे तरुण वर्ग आहे. तो अंमलीपदार्थांच्या सेवनांमुळे पोखरला जात आहे. आपल्या घरातील आपल्या मुलांची बरबादी आपण उघड्या डोळ्यांनी पाहणार का ? माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. आपले  देशाबद्दलचे अज्ञान, एक मोठं राष्ट्रीय पापच नाही का?  एक काळ असा होता की शत्रू दूर होता व आपल्याजवळ लांब पल्ल्याची अग्नी सारखे क्षेपणास्त्र नव्हती. आता ती आपण आपल्या ज्ञानाने निर्माण केली पण त्याबरोबर आपल्या अज्ञानामुळे घरातूनच शत्रू निर्माण होत आहेत.
अस्वस्थ करणाऱ्या चर्चेने मन अस्थिर होई पण शरीर खूप थकलेले असल्याने कधी उष:काळ होई ते समजत नसे. मग परत नवीन प्राण व नवीन राग.

सात दिवस कसे गेले ते समजले नाही. पण खूप काही शिकवून गेले. माझ्या सात पिढ्यांनी सुद्धा जे समजून घेतले नव्हते त्याची प्रत्यक्ष अनुभूती या सात दिवसात झाली. आजी आजोबांचा निरोप घेताना मन दाटून येत होते. पुढील काही दिवसांनी ते चष्मे घेण्यासाठी येणार होते.

आज सकाळपासूनच आमची लगबग सुरु झाली. सगळे कार्यकर्ते आजी आजोबांची वाट पहात होती. जिल्हा रुग्णालयात आम्ही दाखल झालो. सर्व व्यवस्था केली. चष्मा देणारा पण दिब्रुगडहून आला होता. अकरा वाजेपर्यंत बरेच आजी आजोबा आले. त्यांचे डोळे तपासून त्यांना चष्मा आम्ही देत होतो. प्रत्येक जण आता पाहू शकत होते. एक आजोबा तर उड्या मारत म्हणत होते,

“कापा दो ! कापा दो ! कापा दो !” (म्हणजे मला दिसतय).

काही आजींच्या डोळ्यातून पाणी येत होते. काही खूप खुश तर काही खूप शांत.

माझ्या मनात मात्र त्या विलोभनीय दर्शनामुळे निर्माण झालेल्या सार्थकतेची प्रसन्न शांतता होती...आतापर्यंत फार कमी अनुभवली होती मी ती!

आज मात्र सगळेजण हसत हसत आपल्या घरी गेले.
बरोबर १७ दिवसानंतर रात्रीच्या जागरणामुळे मी थोडं जास्त वेळ व गुलाबी थंडीत उबदार रजईत निद्रा देवतेच्या संपूर्ण अधीन झालो होतो.

खड खड खड खड कुणी तरी दरवाजा वाजवत असल्याच्या आवाज आला. मी बघतो तो चांगलेच उजाडले होते. मी दरवाजा उघडला तो समोर एक चष्म्यातल्या आजीबाई उभ्या. चेहऱ्यावर खूप सुरुकुत्या, अंगावर पारंपारिक तागीन कपडे.

मी आजीला नमस्कार केला व म्हटले,

“नो आने दोद्के” (आजी या बसा )

तो पर्यंत जानिया सोकी उठला होता. त्याने आजीची विचारपूस केली. आजी दहा किलोमीटर वरून चालत आलेली होती. त्याने तिला हालहवाल विचारले व येण्याचे कारण पण.

आजी आपल्या भाषेत माझ्याकडे  म्हणाली, “लेका, तुमच्या मुळे मला आता दिसायला लागले. फार अवघड झालं होत. बाहेरच पडता येत नव्हत. सगळ आयुष्य परस्वाधीन पण आत्ता मला माझे सगळे काही करता येते. तुम्ही माझी सेवा केली एक रुपया पण घेतला नाही.” जानिया मला ती बोलत असलेली वाक्य डोळ्यात पाणी आणून सांगत होता. तो खुपच भावूक होता. लहानपणीच आई गेल्याने तो बराच हळवा होता.

“जानिया सामाजिक कामोमें इतनी भावूता नही चलेगी.” मी बऱ्याच वेळी त्याला हे पालूपद सांगत असे.

आजी उठली व तिने आपल्या जवळच्या कपड्यातून एक केळीच्या पानाची पुडी काढली व माझ्या हातावर ठेवत ती म्हणाली,

“मी तुला काही फार मोठ देऊ शकत नाही पण आज तुझी आठवण झाली म्हणून हे तुझ्यासाठी घेऊन आले.” जानियानी मला तिच्या भावना सांगितल्या.

मी केळीच्या पानाची पुडी उघडली. त्यात एक उकडलेले अंडे होते.

आज आठवण झाली म्हणून सकाळीच दहा किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या आजीच्या चेहऱ्याकडे मी पहात होतो. माझ्या डोळ्यातून अश्रूचा निर्झर वाहत होता .........

भारतरत्न  राष्ट्रपतीच्या हाताने घेताना कोणत्या भावना असतात याचा अनुभव मला कधीही येणार नाही. माझ्यासाठी ते अंडे भारतरत्नाच्या पदका पेक्षाही श्रेष्ठ होते ....!!!!


शुक्रवार, २० एप्रिल, २०१२

'बेम्भाटे मास्तरांची शाळा' व 'इवलासा वेलू'


फेसबुक वरील "इवलासा वेलू "काव्य संग्रहाचे उत्साहात प्रकाशन --


एका आगळ्या वेगळ्या प्रयोगाची ही बातमी . फेसबुक वर हजारो गट/ समूह  आहेत, त्या वरच्या निष्फळ चर्चा आणि विकोपाची भांडणे ,किंवा इंटरनेट चे व्यसन या नकारात्मक गोष्टींच्या पार्श्व भूमी वर ही  बातमी मनाला आशेचे पंख  बहाल करते.एका अशाच ई -समूहावर जवळपास १८ कवी ,काही चित्रकारांनी एकत्र येऊन एक स्वप्नं बघितलं ,कवीता संग्रह प्रसिद्ध करण्याचं .आणि महाराष्ट्रातल्या  विविध भागात असलेले हे सगळे जण ,वेगवेगळे व्यवसाय सांभाळून  झपाटून कामाला लागले व अक्षरशः एका महिन्यात हा "इवलासा वेलू " हा कवीता संग्रह तयार देखील झाला प्रकाशना साठी !!!

गदी तारखाच बघाय्च्यात तर २५ मार्च ला ही संकल्पना मांडली गेली व २२ एप्रिल ला हा कवीता संग्रह प्रकाशित होत आहे ,हा देखील एक अनोखा विक्रमच म्हणायला हवाय . "poem is a spontaneous overflow of emotions .." हे खरेच आहे ! जलतरंग किंवा अन्य वाद्यांमध्ये जसे एका तारेला छेडले कि सर्व तारा झंकारू  लागतात तशी ही कवी मने भारल्या गेली आणि सहस्पंदित झालीत... !!!

मुळात ह्या प्रयोगाचे वेगळे पण हे की संपूर्ण कवीता या याच समूहात आधी सादर केल्या गेल्या होत्या व मुखपृष्ठ, मागील पाना चे डिझाईन देखील याच समुहातील व्यक्तींनी बनवलेत. पण हे सर्व करतांना प्रत्यक्ष अशा भेटी झाल्याच नाहीत, तर वेगवेगळ्या ठिकाणी राहत असूनही  संपादक मंडळाने अगदी वेगाने संकलन, संपादन अशा पायऱ्या  पार केल्या .संपादक मंडळात औरंगाबाद चे नवनाथ पवार ,अंबाजोगाई चे दगडू लोमटे ,नागपूरच्या स्वाती धर्माधिकारी यान्नी समन्वय साधला ,चित्रकार  शिरीष पवार व डॉ .संजीव केंद्रे  यांनी खूप मन लावून काम केले व कवितांसाठी चित्र तयार केली .या कवीता संग्रहात अगदी पहिल्यांदाच कवीता प्रसिद्ध करणारे नवीन कवी आहेत तर काही आधी पासून लेखनात रमणारे असे लेखक /कवी पण आहेत ,सुप्रसिद्ध गझलकार श्री .शिवाजी जवरे यांनी या काव्य संग्रहात आमंत्रित कवी म्हणून काही कवीता दिल्या आहेत ,स्मिता गानू जोगळेकर, महेश कुलकर्णी ,.डॉ.सुनील अहिरराव,स्वाती धर्माधिकारी,.डॉ.यशवंत पाटील,. बालाजी सुतार ,. संतोष वाघचौरे, नवनाथ बंडू पवार,. राजीव मासरूळकर. अर्चना साने, संजय बर्वे., दगडू लोमटे, . प्रशांत अजिंठेकर, .प्रशांत देव ,श्रीराम वाघमारे ,हेमंत सहस्त्रबुद्धे ,फेसबुके अशा महाराष्ट्रातल्या कान्या कोपऱ्यात रहाणाऱ्या कवी मित्रांनी यात आपल्या शब्द फुलांचे झेले सादर केलेत . अशा प्रकारे निव्वळ एका महिन्यात प्रसिद्ध होणारा व फेसबुक वरील कवी मित्रांनी एकत्र येऊन संपादित करून तयार केलेला हा एकमेव संग्रह असावा .या संग्रहाचे प्रकाशक,रेणुका प्रकाशन, औरंगाबाद, हे असून जनशक्ती वाचक चळवळ ने या संग्रहाची अक्षर जुळवणी केली आहे. हा "इवलासा वेलू " पार आभाळा वर चढेल अशी आशा आहे 

खर तर  ही शाळाच भन्नाट !! बेम्भाटे मास्तरांकडून प्रेरणा घेऊन "फेस बुके "या आज वर कुणीही न बघितलेल्या इसमाने ही "इ-शाळा" काढली .शाळेचा उद्देश हा की यात येणाऱ्या सदस्याने विद्यार्थ्यान सारखे किंवा शिक्षकान सारखे विद्याव्यासंगी बनावे !!या समूहाला ,ज्याला "बेम्भाटे मास्तरांची शाळा" असे म्हंटले जाते त्या शाळेत अक्षरशः अनेक मोठे मान्यवर व्यक्ती देखील लहान होऊन रंगून जातात .जवळपास ३५० सदस्यता असलेल्या या शाळेत अनेक अभिनव उपक्रम राबवले जातात जसे चित्रकला स्पर्धा ,हस्तकला स्पर्धा ..वगैरे वगरे आणि या मध्ये माधवी धोन्गले व अन्य सदस्य सक्रीय पणे भाग घेतात .मुळात "आनंद दायी शिक्षण "असा सगळा कारभार आहे.. इथे कुणी लहान नाही कोणी मोठा नाही.आपल्या मनातली खळबळ सहज व्यक्त करायला ही शाळा हे एक मध्यम आहे .या शाळेतल्या निवांत बेन्चांवर कधी कोणी कवने रचतो,कोणी चित्र काढतं तर कोणी आणखीन वेगळ्या पद्धतीने स्वतः ला व्यक्त करतात .हा जो "पैस " आणि आत्मपरीक्षणाची संधी सर्वांना मिळते त्यातूनच मग अभिनव कल्पना आणि सृजनशील मनांना नवीन उभारी मिळते ,कारण इतरान कडून भरभरून दाद देखील मिळत असते  
या संग्रहातील कवितांचा आस्वाद घेतांना   कवितांच्या  काना मात्रांच्या काटेकोर हिशेबात न पडता रसिक वाचक त्या रचनांच्या मागील उर्मी समजून घेतील ही आशा व अपेक्षा आहे. कोणतेही काम उत्साहाने पूर्ण केल्या नंतर पाठी वरची शाबासकीची थाप फार मोलाचीच असते नाही का ? आणि आमच्या या प्रयत्नांना, साहित्य क्षेत्रातील पितामह श्री. रा. रं. बोराडे सरांनी तेवढ्याच तत्परतेने सुंदर प्रस्तावना लिहून , कौतुकाची मोहोर उठवली. विशेष म्हणजे त्यासाठी आपला संग्रह त्यांनी अत्यंत कमी वेळात वाचून काढला, आणि प्रस्तावना लिहून होताच स्वत: फोन करुन सांगितलेसुद्धा. एकूणच त्यांच्या शब्दांनी आम्हाला पाठीवर हात ठेवून " लढ " म्हणणारा कोणी मान्यवर भेटला. त्यांचे आभार मानण्यापेक्षा त्यांच्या ऋणात राहून आम्ही नम्रपणे फक्त कृतज्ञता व्यक्त करतो.

जिद्द मनात असली तर कोणतही स्वप्न आपण साकार करू शकतो, आणि जर मदतीला मित्र असले तर मग गोष्टच वेगळी होवून जाते...... कठीण वाटणारा प्रवास पण आपण सहज पूर्ण करू शकतो मित्रांच्या संगतीने...या कवीता संग्रहाच्या निर्मिती पासून अशी प्रेमळ साथ शाळेतल्या सर्वच सदस्यांनी दिलीय ,रश्मी जांभेकर ,संजय सपकाळे या व व अशा अनेक मित्रांनी दिलेल्या त्या प्रोत्साहना मुळेच एका महिन्यात हे कवीता संग्रह काढण्याचे शिवधनुष्य लीलया पेलता आले .

२१ व २२ एप्रिल रोजी नाशिक येथे शाळेच्या सदस्यांचे एक स्नेह संमेलन आयोजित करण्यात आलेय .या संमेलनातच "इवलासा वेलू" या काव्य संग्रहाचे प्रकाशन नामवंत कवी दासू वैद्य यांच्या हस्ते होत आहे. अध्यक्ष स्थानी मिलिंद  कोतवाल  हे असणार आहेत. 

शेवटी फेस बुके गुरुजी म्हणतात त्यात तथ्य आहेच की ,"आपण समजतो तितके हे इंटरनेटचे जग आभासी नाही. आपण या माध्यमा कडे व्यसन म्हणून बघायचं की त्याला सृजन शीलतेच ,कलेच ,संवादाच एक व्यासपीठ मानायचं हा आपलं प्रश्न असतो." 
एक मात्र खर  की या माध्यमाचा अत्यंत कल्पक पणे उपयोग करून या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी जगण्या कडे /जीवना कडे बघण्याची एक सकारात्मक व कल्पक दृष्टी नक्कीच दिलीय.

संपर्क :- नवनाथ पवार:-७७९८५७१८५८

विनीत
फेसबुके,आणि संपादक मंडळ, 
'बेम्भाटे मास्तरांची शाळा', 
विद्यार्थी व गुर्जी लोक,फेसबुक,